श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेटपटू मुंबईत जमायला सुरुवात


फोटोंचा सोशल मिडियावर धुमाकूळ
। मुंबई । वृत्तसंस्था ।
येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौरा करणार आहे. 13 जुलैपासून या दौर्‍याची सुरुवात होणार असून उभय संघांना 3 सामन्यांची वनडे आणि 3 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या मालिकेची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपुर्वीच श्रीलंका दौर्‍यासाठी 20 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघातील सर्व सहभागी खेळाडू श्रीलंकेला रवाना होण्यापुर्वी मुंबई येथे एकत्र जमणार आहेत. तिथे त्यांना 14 दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.

ठराविक नियोजनानुसार 14 जूनपासून सहभागी खेळाडू मुंबईत जमायला सुरुवात झाली आहे. त्यांचे मुंबई विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारतीय संघाचा नवनियुक्त कर्णधार शिखर धवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मुंबईला येतानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्याच्यासोबत संघ सहकारी आणि अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार असल्याचेही दिसत आहे. भुवनेश्‍वरसोबत त्याची पत्नीही मुंबईला आल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर, कुलदीप यादव, दीपक चाहर, नितीश राणा हेदेखील मुंबई विमानातळावर असताना कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या भारतीय संघासाठी श्रीलंका दौरा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित यजमान संघाला पराभूत करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. याबरोबरच या मालिकेतील प्रदर्शनाच्या आधारे त्यांना आगामी टी20 विश्‍वचषकात संधी मिळू शकते. त्यामुळे सर्व सहभागी खेळाडू आपले उत्कृष्ट देण्यासाठी झटताना दिसतील.

Exit mobile version