3-1 अशी आघाडी घेत मालिका खिश्यात
| हरारे | वृत्तसंस्था |
भारतविरुद्ध झिम्बाब्वे संघात शनिवारी (दि.13) झालेल्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने 10 गडी राखत दणदणीत विजय मिळवला. याबरोबरच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेत मालिकाही खिश्यात घातली आहे. या सामन्यात भारतासमोर झिम्बाब्वेने 153 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य भारताने एकही गडी न गमावता 15.2 षटकांत 156 धावा करत पूर्ण केले. यावेळी कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात केली होती.
झिम्बाब्वेच्या 153 धावांचे लक्ष्य गठताना यशस्वी जयस्वाल एका बाजूने आक्रमक खेळत असताना दुसरी बाजू शुभमन गिलने सांभाळली. त्यानंतर दोघेही खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघांनीही फटकेबाजी सुरू करत अर्धशतके पुर्ण केली. या सामन्यात यशस्वी जयस्वाल शतकाच्या अगदी जवळ होता. मात्र, भारताच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण झाल्याने तो 53 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 93 धावांवर नाबाद राहिला. तसेच, गिलनेही 39 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारासंह नाबाद 58 धावा केल्या.
दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 152 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने 28 चेंडूत 46 धावांची खेळी केली. तसेच, वेस्ली मधेवेरेने (25) आणि तादिवानाशे मारुमणी (32) यांनी छोटेखानी खेळी केल्या. भारताकडून गोलंदाजीत खलील अहमदने 2 बळी घेतले, तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.







