| रायगड | प्रतिनिधी |
सध्या शेतीसाठी बाजारात उपलब्ध असलेली खते, अवजारे, बी-बियाणे, कीटकनाशक औषधे आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे खरीप हंगामात शेती कशी करायची? या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मात्र, तरी शेतकरी खत, बियाणे व साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहेत. शेतीसंबंधित साहित्य महाग झाल्याने शेतकरी मात्र मेटाकुटीस आला आहे. दरम्यान, भातशेती नामशेष होण्याच्या मार्गावर असून फळ, फुल लागवडीकडे शेतकर्यांची ओढ लागली आहे.
दरवर्षी ओला-सुका दुष्काळ, वणवा आणि वादळ-वारे या नैसर्गिक संकटांचा सामना करणार्या शेतकर्यांसमोर या वर्षी शेतीच्या साहित्याचे दरवाढीचे नवे संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात शेतकरी भात या एकमेव पिकाची शेती करतो. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भातशेतीसाठी मजूर खर्च वाढलेले असतानाच, ट्रॅक्टरसाठी लागणार्या डिझेलचे दरही वाढत आहेत. यावर्षी खते, बियाणे, औषधांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नैसर्गिक विविध संकटांचा सामना करणार्या शेतकर्यांना हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अनेक वेळा नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळणे दुरापास्त झालेली असतानाच, शेतीसंबंधित साहित्य आणि खतांच्या भाववाढीने शेतकरी कोलमडून गेला आहे. सततच्या महागाईने येथील भातउत्पादक शेतकरी त्रस्त झाला असून फळ, फुल लागवडीकडे वळताना दिसत आहे. कमी मेहनत करून जास्त उत्पन्न मिळावे, यासाठी नवनवीन उपाययोजना करत आहेत.
भातउत्पादक शेतकरी नवनवे प्रयोग करून भाताचे अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मजुरी खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने शेती करणे, अधिक उत्पादन देणार्या वाणांची निवड करणे, पारंपरिक भातशेतीतील काही बाबींकडे दुर्लक्ष करून नवीन अवजारांचा उपयोग करताना दिसून येत आहे. नैसर्गिक आपत्तींचा सामना करणार्या शेतकर्यांना आता खते, कीटकनाशके, तणनाशके औषधे यांच्यावरील अनुदान कमी केले आहेत. त्यात आता त्यांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत. नैसर्गिक संकटांसोबत लढणार्या शेतकर्यांसमोर सरकारने लादलेल्या किमतीचे नवे संकट उभे ठाकले आहे.