। रोहा । प्रतिनिधी ।
कोकणातील शेतकर्यांची भात, आंबा, काजू, नारळ, सुपारी ही मुख्य पिके आहेत. पण विमा कंपन्यांनी आंबा या फळ पिकाच्या विम्यासाठी जाहीर केलेल्या शेतकर्यांच्या हफ्त्यात रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी लावलेला विमा हफ्ता मोठ्या प्रमाणात वाढवला असल्याने जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलाईनझ जनरल इन्शुरन्स व एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या मार्फत फळपीक विमा उतरवला जात आहे. चालू वर्षी 21 नोव्हेंबर पर्यंत आंबा या फळासाठी विमा घेण्याची अंतिम मुदत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा पिकासाठी एक लाख चाळीस हजार या विमा रकमेसाठी शेतकर्यांना प्रति झाड 70 रुपये हफ्ता आकारण्यात येत आहे. पण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यासाठी मात्र प्रति झाड 133 रुपये तर ठाणे जिल्ह्यासाठी 217 रुपये शेतकर्यांना विमा हफ्त्यापोटी इन्शुरन्स कंपनीला अदा करावे लागणार आहेत. रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना मात्र प्रति झाड 294 रुपये विमा हफ्ता द्यावा लागणार असल्याने आंबा बागायतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यासाठी विमा हफ्ता वेगळा का असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी रविवारी (दि.14) दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह रोहा येथे रायगड जिल्हा कृषी प्रबोधिनी यांच्या वतीने आंबा उत्पादक शेतकर्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खांबेरे येथील प्रगतशील शेतकरी गणेश भगत यांनी दिली आहे.