शेकापची मागणी; तहसीलदारांना निवेदन
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागसह संपूर्ण रायगडमध्ये पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे भातशेती, तसेच बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांनी तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेकापच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग सहचिटणीस अनिल गोमा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती संतोष पाटील, पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विकांत वार्डे, ॠषीकेश नाईक (सारळ ग्रामपंचायत), ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन शेळके, युवा कार्यकर्ते रितेश चौलकर, रोहित पाटील, अनिश मिठागरी उपस्थित होते.
यावेळी निवेदनातून शेतकर्यांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. अलिबाग तालुक्यातील शेतकर्यांना मागील दोन वर्षांपासून कोरोना, चक्रीवादळे, अतिवृष्टी या संकटांमुळे शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यातच 5 नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेले भात तसेच शेतात उभे असलेले भातपीक पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या व बागायतदारांचे प्रमाणवर नुकसान झालेले आहे.
शेतकर्यांच्या तसेच बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना त्याची नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदनातून तहसीलदारांकडे मागणी करण्यात आली आहे.