लालबुंद मखमली मृगाचे कीटक अवतरले

कीटकांची अनोखी दुनिया पाहून निसर्गप्रेमी सुखावले
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |

पावसाची सुरुवात मृग नक्षत्राने होते. ग्रामीण भागात मृग नक्षत्र म्हणजे शेती कामाची सुरुवात. या नक्षत्रातच लाल भडक रंगाचे, मखमली वेलवेट च्या कापडासारखा दिसणारे मृगाचे कीटक शेत, माळरान व जंगलात दिसून येतात. मात्र जिल्ह्यात यंदा पावसाची सुरुवात उशिरा झाली. यामुळे हे कीटक उशिराने जमिनीवर दाखल झाले आहे. जिल्ह्यात पाली, सुधागड, पाटणूस, विळे, श्रीवर्धन, रोहा आदीसह इतरही अनेक ठिकाणी दिसू लागल्याने निसर्ग अभ्यासक व पर्यावरणप्रेमी सुखावले आहेत. या

कीटकाला मृग कीटक किंवा मृग नक्षत्राचा किडा असे म्हणतात. या किटकाच्या दिसण्यावरून आणि निसर्गाने केलेल्या त्याच्या अप्रतिम रचनेमुळे याला विविध नावे ठेवण्यात आली आहेत. संस्कृतमध्ये या कीटकाला वीर बाहुती, तेलगूत अरुद्रा, उर्दूत राणी किडा तर मराठीत काही ठिकाणी याला गोसावी किडा देखील म्हटले जाते. तर इंग्रजीचे रेड वेलवेट माईट असे म्हणतात. या किड्याचे शास्त्रीय नाव ट्रॉम्बेडियम ग्रेंडीसिमम असे आहे.

पाटणुस येथील निसर्ग अभ्यासक शिक्षक राम मुंढे यांनी सांगितले की पावसाळ्यात आद्रता वाढल्यामुळे हे कीटक जमिनीवर येतात. पूर्ण वाढ झालेला हा कीटक साधारणतः चार मिलिमीटर लांबीचा असतो, नर कीटक हे मादी किटकांपेक्षा आकाराने लहान असतात. पावसाला सुरुवात झाल्यावर साधारण 20-25 दिवसानंतर, पावसाचा जोर वाढू लागला की हे कीटक स्वतःला पुन्हा जमिनीत गाडून घेतात आणि लुप्त होतात. मृगाच्या पावसात मादीला आकर्षित करण्यासाठी हे कीटक जमिनीवर येतात. मादी ओल्या मातीत अंडी देते. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यातून पिल्ले बाहेत येतात.

हे लाल रंगाचे कीटक दिसू लागले की ग्रामीण भागातील लोक यांची पूजा करून शेतीची मशागत करतात आणि पेरणी करण्यास सुरुवात करतात. मात्र यंदा उशिरा व कमी प्रमाणात हे कीटक दिसत आहेत. निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून संकटाची चाहूल देत असतो. परंतु माणूस हा स्वतःच्या बुद्धिमत्तेने अनेक गोष्टींवर विजय मिळवत चालला आहे. अशी माणसाची धारणा झाल्यामुळे माणसाला संकटाचे हे संकेत दिसून येत नाहीत. यामुळे सद्य परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याचबरोबर अनियमित पावसामुळे भात लावणी करण्यास सुद्धा उशीर होत आहे. निसर्गाचे हे संकेत लवकरच आपण ओळखले आणि निसर्गाचा होणारा र्‍हास आपण कमी केला तर भविष्यामध्ये आपल्याला निसर्ग भरभरून देणार हे मात्र निश्‍चित आहे.

शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या रासायनिक खतांमुळे तसेच काही ठिकाणी या कीटकांना मलेरिया पॅरलिसीस या रोगांवर उपाय म्हणून पकडून मारून औषधाप्रमाणे त्याचा वापर करतात. यामुळे या कीटकांची संख्या कमी होत चालली आहे. याचे संरक्षण व संवर्धन करण्याची गरज आहे.

राम मुंढे, पर्यावरण अभ्यासक
Exit mobile version