| आगरदांडा | प्रतिनिधी |
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीत कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत यांनी नुकतीच गोल बंगला, बाजारपेठ, तवसाळकर लॉज इत्यादी ठिकाणी जाऊन नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना सुरु करा. पावसाळ्यात पाणी तुंबता कामा नये. तरी गटारे व नाल्याची सफाईला लवकरात लवकर सुरू करा. ही कामे मे महिन्याच्या आत झाली पाहिजे. असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगत शहरातील मुख्य बाजारपेठ येथील शौचालयाची देखील पाहणी केली. अधिकाऱ्यांनी यावर लवकरात लवकर उपाययोजना करुन सुंदर व स्वच्छ शौचालय बनवुन नागरिकांना चांगली सुविधा द्या, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी मुरुड जंजिरा नगरपरिषद बांधकाम सभापती यास्मिन कादिरी, नगरसेवक ॲड. रुपेश पाटील, नगरसेवक आदेश दांडेकर, नगरसेवक तमीम ढाकम, नगरसेवक श्रीकांत खोत, ओम पाटील, बांधकाम अभियंता अनिकेत वाजे, अनिकेत जगदाळे, अमोल रणदिवे आदिंसह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.







