| उरण | वार्ताहर |
उरण रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातातील आरोपी जय चंद्रहास घरत यास अटक होऊ नये, म्हणून जंगजंग पछाडणार्या राजकीय नेत्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. महाराष्ट्र दिनी उरण पोलिसांना जय घरतला अटक करण्यात यश आले आहे. यामुळे जय घरत यास अटक होणारच नाही, अशा वल्गना करणार्यांचे चेहरे पांढरे पडले आहेत. न्यायालयाने जय घरत यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उरण शहरातील रेल्वे स्थानकासमोर शनिवारी (दि.6 एप्रिल) रात्री 11 वाजता क्रेटा चारचाकी चालकाने भरधाव वेगात स्कुटरला धडक दिल्याने पती, पत्नीचा मृत्यू तर तीन वर्षांची चिमुरडी जबर जखमी होण्याची दुर्दैवी घटना घडली होती. अपघातातील चिमुरडी अद्यापही दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहे. अपघातानंतर दोन दिवसांनी झालेल्या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पोलीस गणवेशामध्ये उपस्थित आहेत. त्यावेळी आरोपी चालक जय घरत हा ही तिथे असल्याचे दिसत आहे. मग आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालाच कसा, असा संशय निर्माण होत होता. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चालक जयचे वडील हे आमदार महेश बालदी यांच्या मर्जीतील असल्याने आरोपीस अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे बोलले जात होते.
याबाबत नुकतीच न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी या घटनेतील फिर्यादी रेल्वे पोलीस राजेंद्र चव्हाण यांनी न्यायालयात व्हिडिओ सादर केल्यानंतर न्यायाधिशांनी पोलिसांवर ताशेरे ओढत तुम्ही कारवाई का केली नाहीत, अशी विचारणा केली. त्यावेळी तपास अधिकारी यांनी आपल्याकडे हे व्हिडीओ नसल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांचा निष्क्रियपणा उघड झाला आहे. न्यायालयाने आरोपी जय घरतचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज आरोपीच्या वकिलांना मागे घेण्याची नौबत आली. यामुळे आरोपीला अटक करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. यानंतर एक मे रोजी आरोपी जय घरत यास उरण पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले. न्यायालयाने आरोपी जय घरत यास 6 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
भीषण अपघात होऊन ही आरोपी जय घरत यास अटक करण्यात शासकीय यंत्रणेकडून चालढकलपणा सुरू होता. उरणमधील काही राजकीय पुढारी मांडवली करण्यासाठी केविलवाणी धडपड करीत होते. तर काही पुढारी पत्रकारांनी बातम्या दिल्या असल्यातरी जय घरत यास अटक होणार नाही. अशा बढाया नाक्यांनाक्यांवर मारीत होते. परंतु उरणच्या काही जागृत पत्रकारांनी व अपघातातील प्रमुख साक्षीदार हे आपल्या साक्षीवर ठाम राहिल्याने न्यायालयाने याची दखल घेऊन जय घरत याचा अटकपूर्व जामीनच रद्द केल्याने अटकेशिवाय पर्यायच उरला नव्हता. यामुळे बढाया मारणार्यांना चपराक बसली आहे.