रायवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा; जयदीप राऊळची भारतीय लष्करात निवड

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

भारतीय लष्करात दाखल होऊन भारत मातेच्या सेवेचे स्वप्न उरात बाळगून सत्यात उतरवणार्‍या अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी गावाचा सुपुत्र जयदीप जितेंद्र राऊळ याची भारतीय लष्कराच्या तांत्रिक सहाय्यकपदी निवड झाली आहे. तो देखील आपले नाव इतिहासात कोरेल, अशी सदिच्छा सर्वस्तरातून व्यक्त होत आहे.


आजची तरुणाई संगणकीय युगात फॅशनच्या दिशेने झुकलेली असताना केवळ आणि केवळ मातृभूमीच्या रक्षणासाठी निधड्या छातीने पुढे येणारे तरुणदेखील आदर्श ठरत आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमधून पदवीधर बनण्यापेक्षा प्रथम देशाचे पाईक बनण्याचा निर्धार करणार्‍या तरुणांची संख्या वाढताना दिसत आहे. असेच ध्येयवेड्या तरुणाने अवघ्या 20व्या वर्षी आपले आयुष्य देश सेवेसाठी वेचण्याचा निर्णय घेऊन मित्रांसह गावकर्‍यांनादेखील बुचकळ्यात पाडले. जीवन सार्थकी लावायचे असेल तर देशसेवा हा एकमेव उत्तम पर्याय आहे, असे अलिबाग तालुक्यातील रायवाडी गावचा सुपुत्र जयदीप राऊळ याच्याकडून सांगण्यात आले आहे. शालेय शिक्षण पुर्ण होण्याआधीच सैन्यात भरती होऊन देश सेवाकरण्याचा निर्धार त्याने पक्का केला होता. जयदीपने आपले सैन्य भरतीसाठी अपेक्षित असणारे शिक्षण कधी पूर्ण होते याची प्रतीक्षा केली होती. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जयदीपने सैन्यात दाखल होण्यासाठी तयारी सुरु केली. पहिल्या काही प्रयत्नांमध्ये त्याला यश आले नाही. मात्र, जयदीपने प्रयत्न सोडले नाहीत. त्याने अधिक चिकाटीने आणि जिद्दीने सैन्यात भरती होण्यासाठीचा सराव सुरु ठेवला.


अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलेच. जयदीपची भारतीय लष्कराच्या तांत्रिक सहाय्यकपदी निवड झाल्याचे कळताच कुटुंबीयांसह गावकर्‍यांनी एकच जल्लोष केला. जयदीप राऊळचे शालेय शिक्षण सं.मं. हायस्कुल नागांव आणि उच्च माध्यमिक शिक्षण जे.एस.एम. विद्यालय अलिबाग येथे झाले असून त्याला प्रशिक्षणासाठी मध्यप्रदेश येथे पाठविण्यात आले आहे. तेथे त्याचे पुढील प्रशिक्षण सुरू होणार आहे. यावेळी आक्षी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, श्री गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ रायवाडी तसेच सर्वपक्षीय नेते, पुढारी, कार्यकर्ते, कुटुंबीय यांनी जयदीपची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच फोन आणि सामाजिक माध्यमांद्वारे त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version