परतावा न मिळाल्याने ठेकेदार मेटाकुटीला
| वेनगाव | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात केंद्राची जलजीवन नळपाणी योजना ही निधीअभावी रखडली आहे. त्यामुळे या योजनेतील 123 पैकी 71 योजना बंद पडल्या आहेत. तसेच, ज्या 51 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत, त्या कामाचे पैसे संबंधित ठेकेदारांना मिळालेले नाहीत. ते पैसे मिळविण्यासाठी ठेकेदार गेल्या काही महिन्यांपासून सबंधित विभागाकडे मागणी करत असून ते अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे संबंधित ठेकेदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
‘जलजीवन मिशन’ ही भारत सरकारची एक योजना आहे. त्याचा उद्देश 2019 ते 2028 या कालावधीत ग्रामीण भारतातील प्रत्येक घराला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे. या मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठी नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा हेतू आहे. 2028 पर्यंत दररोज 55 लिटर नळाचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. कर्जत तालुक्यात 123 गावांमध्ये जलजीवन नळपाणी योजना मंजूर झालेल्या आहेत. त्यातील प्रत्येक योजनेच्या अंदाज पत्रकानुसार निविदा रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या कर्जत उपविभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलजीवन योजनेच्या गोषवारा यादीत कर्जत तालुक्यात एकूण 123 मंजूर योजना आहेत. त्यातील 51 योजनेतील कामे पूर्ण झालेली आहेत. तर, 40 योजनेतील कामे प्रगतीत दाखवण्यात आली आहेत. तसेच, या गोषवारा यादीत एकूण 31 जलजीवन नळपाणी योजनेतील कामे बंद असल्याची माहिती दर्शवली आहे. परंतु, ज्या योजना पूर्ण झाल्या आहेत त्याचे बिल संबंधित ठेकेदारांना मिळालेले नाही. तसेच, जी कामे प्रगतीत दाखविण्यात आली आहेत ती पैसे मिळत नसल्याने संबंधित ठेकेदाराकडून अपूर्णावस्थेत ठेवली आहेत. आणि उर्वरित योजना निधी अभावी बंद पडल्या आहेत. जी कामे पूर्ण झालेली आहेत त्याचा मोबदला देखील संबंधित ठेकेदारांना मिळाला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. तसेच, शासनाच्या उदासीन धोरणामुळेच या योजना बंद पडल्या आहेत, असे नाराजीचे सूर जनतेमधून देखील उमटत आहेत.
ठेकेदारांवर कर्जबाजाराचे संकट
कर्जत तालुक्यातील 123 गावांमध्ये जलजीवन नळपाणी योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यातील काही योजना पूर्ण झाल्या असून काही अपूर्णावस्थेत आहेत. त्यातील पुर्ण झालेल्या 51 योजनांचे पैसे संबंधित ठेकेदारांना मिळाले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. तसेच, जी 40 कामे प्रगतीपथावर दाखविण्यात आली आहेत, ती कामे निधीअभावी रखडली असल्याचे देखील ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे. ही कामे पुर्ण करण्यासाठी काहींनी कर्ज काढून किंवा एखादी मौल्यवान वस्तू गहाण ठेवून कामे पूर्ण केली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या कामांचा परतावा मिळण्यासाठी सबंधित विभागाकडे मागणी करत आहेत. परंतु, त्यांच्याकडून ‘पैसे आले नाहीत’ असे सांगण्यात येत आहे. काम केल्याचे पैसे मिळत नसल्याने कर्जबाजाराचे संकट ओढावत आहे, असे संबंधित ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे.
योजनेची प्रमुख उद्दिष्ट्ये
ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणी पोहोचवणे. प्रत्येक व्यक्तीला दररोज 55 लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे. सुरक्षित आणि पुरेसे पिण्याच्या पाण्याची नियमित उपलब्धता सुनिश्चित करणे. दूषित पाण्याच्या स्त्रोतांवर लक्ष केंद्रित करून सुधारणा करणे.
जलजीवन योजने अंतर्गत कर्जत तालुक्यात एकूण 123 योजना मंजुर करण्यात आल्या आहेत. त्यातील काही कामे पूर्ण झालेली आहेत. जी कामे अपूर्णावस्थेत किंवा बंद आहेत ती ठेकेदार काम करत नसल्यामुळे बंद आहेत.
– संतोष चव्हाण, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, राजिप उपविभाग-कर्जत







