| उरण | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील उरणसारख्या छोट्या शहरातून साप्ताहिक चालवणे म्हणजे तारेवरची कसरत! अनेकांनी प्रयत्न केले, अनेकांची वृत्तपत्रे बंद पडली. पण या सगळ्यांना छेद देत सौ. वैशाली घन:श्याम कडू यांनी ‘साप्ताहिक प्रांजल’च्या माध्यमातून गेली 12 वर्षे उरणमध्ये पत्रकारितेचा झेंडा बुलंद ठेवला आहे.
घर, संसार, जबाबदाऱ्या आणि त्याचबरोबर समाजकारण या सगळ्यांचा समतोल साधत त्यांनी उरणमधून ‘प्रांजल’ची ठाम सुरुवात केली. दर सोमवारी नियमित प्रसिद्ध होणारे हे साप्ताहिक आज उरणमधील सर्वसामान्यांचे ‘हक्काचे व्यासपीठ’ बनले आहे. अन्यायग्रस्तांच्या वेदनांना शब्द देणे, प्रशासनाच्या ढिलाईवर बोट ठेवणे, सामान्य माणसाच्या प्रश्नांना आवाज देणे हे काम सौ. वैशाली कडू यांनी निर्भीडपणे केले. त्यांच्या लेखणीतून अनेक प्रश्न थेट सत्तेच्या दारात पोहोचले. त्यामुळे ‘प्रांजल’ हे केवळ साप्ताहिक न राहता जनतेचा लढवय्या आवाज ठरले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत द्रोणागिरी महोत्सवात ‘द्रोणागिरी पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच साई देवस्थान वहाळ तर्फे महिला दिनानिमित्त ‘आदर्श महिला पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ व्यक्तीचा नसून उरणमधील निर्भीड पत्रकारितेचा आहे.12 वर्षांपूर्वी लावलेले ‘प्रांजल’चे छोटे रोपटे आज भक्कम वटवृक्ष बनले आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहिताच्या प्रश्नांवर थेट प्रहार करणारे हे साप्ताहिक अल्पावधीतच उरणमध्ये प्रभावी ठरले आहे.
“लेखणी हीच ताकद, आणि सत्य हाच धर्म,” या भूमिकेतून त्या समाजहितासाठी झुंज देत आहेत. आजपर्यंत सौ. वैशाली कडू यांनी आपल्या पत्रकारितेतून गोर गरीब सर्वसामान्य जनतेला न्याय दिला आहे. त्यामुळे एक आदर्श गृहिणी आदर्श संपादक म्हणून त्यांचा सर्वत्र गौरव होत आहे.
शब्दांकन / लेखन – विठ्ठल ममताबादे, उरण







