। उरण । वार्ताहर ।
अलीकडे समुद्रात प्रदूषण वाढल्याने मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मच्छीमारीचा व्यवसाय करणार्या कोळी बांधवांनी ट्रोलर किनारी लाऊन घरी बसणे पसंत करीत असले तरी उपजीवेकीसाठी आता ते खाडी किनारी मासेमारी करणे पसंत करीत आहेत. परंतु, या ठिकाणीही मासेमारी करताना त्यांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असून रायगड जिल्ह्यात सापडणारा आणि माश्यांचा राजा म्हणून ज्या जिताडा माश्याची ओळख आहे तो मासा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची खंत आगरी-कोळी बांधव व्यक्त करताना दिसत आहेत.
रायगडमध्ये आलेल्या कोणत्याही बड्या नेत्याने लालपटणीची भाकरी व जिताड्याचा आस्वाद घेतला नाही असे कधी झाले नाही. ज्या जिताड्याने केवळ राज्यातील नव्हे तर दिल्ली पर्यंतच्या राजकारण्यांच्याही जिभेवर चव रेंगाळत ठेवली आहे. रायगड जिल्ह्यातील भातशेतीत विशेषतः खाडी किनारच्या शेती कापणीच्या वेळी सापडणारा चविष्ठ आणि माशांचा राजा म्हणून गणला जाणारा जिताडा वाढत्या प्रदूषणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने येथील आगरी-कोळी समाजाला चिंतेने ग्रासले आहे.
भात शेतीतील समुद्र किनारी असलेल्या उरण, पनवेल, अलिबाग आणि मुरुड यांसारख्या ठिकाणी खाडीतून आलेल्या खार्या पाण्याबरोबर येणार्या विविध जातीच्या माशांच्या अंड्यात जिताड्याचीही अंडी येतात. जिताडा समुद्रातही अंडी घालतो. जिताडा समुद्रातही मिळतो. मात्र, शेतीतील त्याच्या चवीची तुलना समुद्रातील सापडलेल्या जिताड्याशी होत नाही. भातशेती पिकल्यावर तिची कापणी सुरु होते. त्यावेळी शेताच्या खड्ड्यात जे पाणी शेतीसाठी आतून साचलेले असते त्यात जिताडा हमखास सापडतो. भातशेतीच्या पिकांवरील फुले हे त्याचे मुख्य खाद्य असल्याने त्याची चव वेगळी असते. जिताडा सर्व माशांपेक्षा चविष्ट असल्याने तो तळून किंवा कालवण करूनही खाल्ला तरी त्याची चव कायम राहते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकर्याच्या घरात चिकन, मटनापेक्षा जिताड्याच्या जेवणाला अधिक प्रतिष्ठा आहे.
मात्र, काही वर्षापासून जिल्ह्यातील भातशेतीचे औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात संपादन करण्यात आले, त्यामुळे विविध रासायनिक कंपन्यांकडून नदी आणि खाडीत सोडण्यात येणारे रासायनिकयुक्त पाणी समुद्रात होणारा भराव, टाकण्यात येणारा केरकचरा यामध्ये असणार्या प्लास्टिकच्या पिशव्या, वेळोवेळी जहाजावरील होणारी तेल गळती यांचा परिणाम इतर माशांबरोबर जीताड्यावर झाल्याने परिणामी जिताडा मासा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.