जितेंद्र आव्हाड करणार मनुस्मृतींचे दहन

| मुंबई | प्रतिनिधी |

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्‍लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याला कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड बुधवारी महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथेच मनुस्मृतीची होळी केली होती. ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील महाड येथेच मनुस्मृतीची होळी करणार आहेत. मनुस्मृतीमधील तीन श्‍लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज 5000 वर्ष त्रासात जगले, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणत आहे, याचा तीव्र विरोध व्हायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचे दहन केले. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन याचे दहन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत. त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन आव्हाड यांनी केले आहे.

सत्ताधारी मागच्या दाराने त्यांच्या मनातील गोष्ट पूर्ण करु पाहत आहेत. आमच संविधान म्हणजेच मनुस्मृती, असे म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडते, त्याचे उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे. ज्या मनुस्मृतीने भारताचे वाटोळं केले, समाजात दुही माजवली आहे, समाजामध्ये चातुवर्ण्याचा समावेश केला, जातीभेद निर्माण केला, स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक घेण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्मला घातली, ती मनुस्मृती परत आणली जात आहे.

जे लोक 1950 साली म्हणाले की, आम्हाला तुमचे संविधान मान्य नाही, आमचे संविधान म्हणजे मनुस्मृती. तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये मनुस्मृती दहन केले आणि 1950 मध्ये संविधान जन्माला घातले. त्यासाठी आपण महाडला जात आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करून आपण मनुस्मृतीच दहन करतोय. संविधानासाठी दो बलिदान, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Exit mobile version