मान्सुनपुर्व आपत्ती व्यवस्थापन बैठकीत २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना
। चिपळूण । प्रतिनिधी ।
अतिवृष्टी व महापुराच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जम्बो आराखडा तयार केला आहे. यामध्ये तालुकास्तराववर २४ तास नियंत्रण कक्ष सुरु राहणार आहे. पूरग्रस्त भागातील ग्रामपंचायतींनी सोयी सुविधांसह निवारा केंद्र, आवश्यक बचाव साहित्य तयार ठेवण्याच्या सूचना गुरुवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत देण्यात आल्या.
शहरातील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली व तहसिलदार जयराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सनपुर्व आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक पार पडली. यावेळी नगरपालिका, वीजमंडळ, सा.बां. विभाग, जि.प.बांधकाम विभाग, वनविभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, वीज मंडळ, पाटबंधारे, जलसंपदा विभाग, कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभाग या सर्वांची आपत्री व्यवस्थापन अंतर्गत मान्सुनपुर्व आढावा घेण्यात आला. गतवर्षी २२ व २३ जुलै रोजी शहरासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे हाहा:कार उडाला होता. महापुरात संपुर्ण चिपळूण नगरी उद्ध्वस्त झाल्याने येथील नागरिकांना मोठा फटका बसला होता. ही परिस्थिती पुन्हा उदभवू नये, यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तीन महिने वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशाचे काम सुरु आहे. मे अखेरपर्यंत हे काम सुरु राहणार आहे. त्यातच आता प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच त्याला मान्यता देण्यात आली. त्यानुसार दरड प्रवणक्षेत्र, पूर क्षेत्रात सुचविलेल्या उपाय योजनानुसार पालिका व ग्रामपंचायतींनी आराखडे तयार करावेत. ग्रामपंचायतींनी तात्पुरते निवारा केंद्रासाठी इमारती शोधून त्यांची माहिती द्यावी. आपत्ती काळात ग्रामपंचयातीमधील स्वयंसेवक गट तयार करून त्यांना प्रशिक्षण द्यावे, मान्सून कालावधीत कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुर्व परवागीशिवाय रजा देऊ नये, बांधकाम विभागामार्फत पूरग्रस्त व दरडग्रस्त गावातील धोकादायक साकवांची तात्काळ दुरुस्ती करणे, शिक्षण विभागामार्फत आपत्त्कालीन परिस्थितीत तात्पुरता निवारा केंद्रांची व्यवस्था करावी. भूवैज्ञानिकांनी सुचविल्याप्रमाणे तिवडी व माच धनगरवाडी, कोळकेवाडी येथील शाळांचे स्थलांतर करण्यात यावे. तालुक्यातील सर्व रस्ते मार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणांची यादी तयार करावी, सर्व महामार्गावर गॅस कटर, जेसीबी, डंपर, क्रेन, रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात, चिपळूण उपविभागातील मान्सून कालावधीत समुद्राच्या मोठ्या भरतीच्या वेळी प्रमुख बंदरावर व समुद्र किनारी भागात पोलीस बंदोबस्त पुरविणे, पोलीस विभागाला आवश्यक शोध व बचाव साहित्याचा तपशील जिल्हा नियंत्रण कक्षात सादर करणे, दरडग्रस्त भागात पेट्रोलिक, मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या संभाव्य साथ रोगाच्या नियंत्रणासाठी आरोग्य पथके तयार करणे, जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांची यादी व त्यांचे संपर्क क्रमांक, गरवर्षात ज्या गावात साथीचे आजार पसरले होते त्या सर्व गावांमध्ये विशेष खबरदारी घेण्यात यावी. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात यावा. सर्व ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तालुक्यातील रेडकार्ड, यलोकार्ड व ग्रीनकार्ड गावांची माहिती देण्यात यावी. साथ प्रवण व जोखमीच्या गावांमध्ये फवारणी करणे, तसेच मलेरिया व लेप्टो साथ प्रतिबंधनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. सर्व गावात आवश्यक क्लोरीन गोळ्या, टीसीएल, मेडीक्लोरचा पुरवठा करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.
दि. १ जून ते ३१ जुलै या मासेमारी बंदीच्या कालावधीत मासेमारी होणार नाही. मच्छीमार समुद्रात जाणार नाहीत, याची खबरदारी बाळगावी, हवामान खात्याकडून प्राप्त होणारी सुचना, चक्रीवादळ विषयकसूचना, स्थानिक मच्छिमार संस्था, समुद्र किनारी गावातील तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी, आशा वर्कर्स, पोलीस पाटील यांना देण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे स्थलांतर करण्याबाबतचे नियोजन व आराखडा तयार करणाच्या सूचनाही देण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्यासह बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, नगरपरिषद, कोकण रेल्वे, महावितरण, जलसंपदा आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.