शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!

पंधरा वर्षांच्या संघर्षानंतर वडिलोपार्जित जमीन परत; माजी आ. जयंत पाटील यांचेे मानले आभार

| पनवेल | प्रतिनिधी |

पंधरा वर्षांपासून महसूल विभाग आणि न्यायालयीन पातळीवर न्यायासाठी सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश आले असून, मौजे साई येथील सर्व्हे क्रमांक 126/2 मधील 108 गुंठे वडिलोपार्जित जमीन भोंडकर कुटुंबाला परत मिळाली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उभारलेल्या शेतकरी सभेच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळे हा न्याय मिळाल्याचे सांगत नितीन भोंडकर यांनी जयंत पाटील यांच्यासह शेकापच्या पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले आहेत.

नितीन भोंडकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबाच्या चार पिढ्यांपासून ताबे-कब्जात असलेल्या या जमिनीवर महसूल नोंदीमध्ये कथित फेरफार करण्यात आले. या प्रकरणात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या संगनमताने नोंदीमध्ये खाडाखोड करून भोंडकर कुटुंबाला त्यांच्या कुळाच्या जमिनीपासून बेदखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या जमिनीचे दोन वेळा खरेदीखत झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. साई परिसरातील या 108 गुंठे जमिनीची सध्याच्या सरकारी बाजारभावानुसार किंमत सुमारे 10 कोटी 80 लाख रुपये असल्याचे भोंडकर कुटुंबियांचे म्हणणे आहे.

शेतकरी सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर जमीन मूळतः भोंडकर कुटुंबाची वडिलोपार्जित कुळ जमीन होती. या जमिनीशी संबंधित भोपाळ येथील सावकार गोपीनाथ देशपांडे यांचा 1958 मध्ये, तर मधुकर देशपांडे यांचा 1969 मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर वारस नोंद झालेली नसतानाही पुढील काळात जमिनीच्या नोंदीमध्ये बदल झाल्याचा आरोप आहे. दरम्यान, भोंडकर कुटुंबीय 2010 पासून तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच न्यायालयीन स्तरावर न्यायासाठी पाठपुरावा करीत होते. मात्र, तब्बल 15 वर्षे प्रयत्न करूनही त्यांना अपेक्षित न्याय मिळत नसल्याने त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल कार्यालयात आपली कैफियत मांडली.

नितीन भोंडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिल्यानंतर शेतकरी सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे यांनी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे ढवळे यांनी सांगितले. शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकरी सभेच्या पुढाकाराने 8 ऑगस्ट 2025 रोजी पनवेल येथील अपर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेकडो शेकाप कार्यकर्ते आणि शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जमिनीच्या नोंदीतील कथित त्रुटी आणि फेरफार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे ढवळे यांनी सांगितले.

ढवळे यांच्या म्हणण्यानुसार, देशपांडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांची कायदेशीर नोंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी होणे गरजेचे होते. संबंधित मृत्यू दाखल्यांची पडताळणी तसेच वारस असल्याचे सिद्ध करणारे आवश्यक प्रमाणपत्र घेणे अपेक्षित असतानाही प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने झाल्याचा आरोप त्यांनी केला.

याशिवाय, साई येथील तलाठी कार्यालय ज्या ठिकाणी भाड्याने होते, त्या जागेशी संबंधित व्यक्तीनेच पुढे सदर जमीन खरेदी केल्याचा दावा ढवळे यांनी केला आहे. वारस नोंद, अर्ज, मंजुरी आणि सातबारा उताऱ्यातील नोंदी एकाच दिवशी झाल्याचा मुद्दाही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. या सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दोन खरेदीखते, नोंदीत फेरफार
या जमिनीची दोनदा खरेदी खते करण्यात आली असून, नोंदीतही फेरफार होती. शेतकरी सभेच्या माध्यमातून हे प्रकरण हाती घेतल्यानंतर कागदपत्रांची छाननी, प्रशासनाकडे पाठपुरावा आणि आंदोलन करण्यात आले. साई परिसर हा औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असल्याने या जमिनीचा सरकारी दर सुमारे 10 लाख रुपये प्रतिगुंठा असल्याचे शेतकरी सभेकडून सांगण्यात आले. त्यामुळे 108 गुंठे जमिनीची किंमत सुमारे 10 कोटी 80 लाख रुपये होत असल्याचा दावा आहे.

गेली 15 वर्षे आम्ही आमच्या वडिलोपार्जित जमिनीसाठी महसूल विभागापासून न्यायालयापर्यंत संघर्ष करीत होतो. अनेक ठिकाणी पाठपुरावा करूनही न्याय मिळत नव्हता. मात्र, शेतकरी सभेकडे कैफियत मांडल्यानंतर अनिल ढवळे यांनी आमची कागदपत्रे तपासून प्रकरणाचा पाठपुरावा केला. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे आमच्या प्रश्नाला ताकद मिळाली. शेतकरी सभेच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळाला असून, या न्यायाचे श्रेय शेकाप सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील यांना देतो. त्यांच्यासह बाळाराम पाटील, अनिल ढवळे, संतोष पाटील, शेकापचे पनवेल युनिट तसेच कासारभाट आणि साई येथील ग्रामस्थांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.

नितीन भोंडकर

भोंडकर कुटुंबाने आमच्याकडे प्रकरण मांडल्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली असता अनेक गंभीर प्रश्न निदर्शनास आले. वारस नोंद, मृत्यू दाखले, अर्ज, मंजुरी आणि सातबारा नोंदी याबाबत अनेक बाबींची पडताळणी आवश्यक होती. शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकरी सभेच्या पाठपुराव्याला यश आले असून, पंधरा वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या भोंडकर कुटुंबाला त्यांची जमीन परत मिळणे ही शेतकरी चळवळीची मोठी जमेची बाजू आहे.

अनिल ढवळे,
जिल्हाध्यक्ष, शेतकरी सभा
Exit mobile version