गेलविरोधात कळंबुसरे शेतकरी एकवटले

पेट्रोलियम खनिज पाईपलाईनला विरोध
विरोध दर्शविण्यासाठी प्रकल्पबाधित शेतकरी एकत्र

| उरण | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण व अलिबाग तालुक्यातील गावांतील गेल इंडिया लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रमातून पेट्रोलियम व खनिज पाईपलाईन संबंधित गावातील शेतकर्‍यांच्या जमिनीमधून टाकली जात आहे. शेतजमिनीतून पाईपलाईन टाकल्यास आजूबाजूचे क्षेत्रदेखील लागवडीयोग्य राहणार नाही. शेतकर्‍यांवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे, म्हणून या प्रकल्पास कळंबुसरे शेतकर्‍यांनी एकत्र येत या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी रविवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता मोठी जुई वाडा येथे संघटित होऊन विरोध दर्शविला.

शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, सदर मिळकतीतूनदेखील कंपनीने प्रोपेन वाहून नेणारी पाईपलाईन टाकल्यास आम्हास पीक घेणे अशक्य होऊन आमचे उपजीविकेचे साधनच नष्ट होणार आहे. त्याशिवाय भविष्यात सदर मिळकतीत आम्हास कोणताही इतर व्यवसाय, उपक्रम करता येणार नाही. त्याचप्रमाणे सदरच्या मिळकती या इतर कोणत्याही प्रकल्पाकरिता संपादित करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आम्हास या मिळकतीच्या मोबदल्यात भविष्यात निर्माण होणारे प्रकल्प अथवा इतर उपक्रमातून मिळणारे फायदे यापासूनसुद्धा वंचित राहावे लागेल.

या मिळकतीतून आम्हास होणारे फायदे गेल कंपनीकडून अस्तित्वात येण्यापूर्वीच नाहीसे होतील. त्यामुळे या मिळकतीतून गेल कंपनीने प्रोपेन पाईपलाईन टाकल्यास सदरच्या मिळकती या नापिक होऊन शेतकर्‍यांचे उपजीविकेचे साधन गेल कंपनीकडून नष्ट होत असल्याने भविष्यात आमच्यावर वायुगळतीसारखे प्रकार झाल्यास आमच्या जीविताला धोका निर्माण होणार आहे. याअगोदरही लगतचे क्षेत्रामधून एलपीजी पाईपलाईन गेलेली असल्याने त्यामध्ये बरेच क्षेत्र संपादित झालेले आहे. या संपादित क्षेत्राची नुकसान भरपाई प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे गेल कंपनीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या प्रकल्पास आमचा सक्त विरोध आहे, असे उपस्थित शेतकर्‍यांनी सांगितले. यावेळी कृष्णा तांडेल, राजेश पाटील, सुनील केणी, रत्नाकर राऊत, विशाल पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, सुरेश भेंडे, रुपेश पाटील यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते. पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

सध्या येणार्‍या पाईपलाईनद्वारे आणखी क्षेत्र नापिक होऊन शेतकर्‍यांस त्यांचे उपजीविकेचे साधन असलेले भाताचे तसेच दुबार पिकाचे उत्पन्न घेता येणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे. या प्रकल्पास आम्हा शेतकर्‍यांचा सक्त विरोध आहे.

– नंदकुमार तांडेल, प्रकल्पग्रस्त शेतकरी


Exit mobile version