असत्याला साथ देणारे कलियुग संपणार- पालकर

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यात गेली 25 तर एकूण 35 वर्षे पत्रकारिता करताना हार-प्रहार, पुरस्कार- तिरस्कार, सन्मान-अपमानाचे प्रसंग असंख्य सोसले. मात्र, यंदा मिळालेल्या राज्यस्तरीय आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकारिता पुरस्कारानंतर तिरस्काराची तीव्रता क्षीण झाल्याने आता असत्याला साथ कलियुग संपणार असल्याचा आशावाद निर्माण झाला असल्याचे मत ज्येष्ठ ग्रामीण पत्रकार शैलेश पालकर यांनी व्यक्त केले.

गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा आणि दर्पण राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार शैलेश पालकर आणि रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचा यंदाचा आदर्श ग्रंथपाल पुरस्कार विजेत्या निकिता अभिजित यांचा सत्कार पोलादपूर तालुका वाचनालयातर्फे करण्यात आला. यावेळी पत्रकार पालकर हे सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

याप्रसंगी व्यासपिठावर वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.संजय शेठ, ज्येष्ठ संचालक मधुआण्णा शेठ, संचालक बिपिन शेठ, संचालक अपर्णा भागवत, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी महाडीक तसेच वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक डॉ. रवींद्र सोमोशी आणि साने गुरूजी बालवाड्मय राज्य लेखिका अरूणा भागवत व्यासपीठावर उपस्थित होत्या. प्रारंभी ज्येष्ठ संचालक मधुआण्णा शेठ यांनी सत्कारमूर्ती पत्रकार पालकर आणि निकिता शेठ यांच्या कार्याची माहिती दिली.

याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये साने गुरूजी विद्यालय लोहारेचा श्रेयांक अमोल शिंदे हा प्रथम, जनसेवा प्रतिष्ठानची श्रावणी गणपत निकम ही द्वितीय, कन्या शाळा पोलादपूरची मंगेश कोलवडकर तृतीय तर जनसेवा प्रतिष्ठानचा अमोल उदय खरे यास उत्तेजनार्थ पारितोषिक तसेच मोठया गटामध्ये साने गुरूजी विद्यालय लोहारेची सुमिधा सुमित तुर्डे प्रथम, विद्यामंदिर पोलादपूरची कार्तिकी विजय साळवी द्वितीय, सडवली प्राथमिक शाळेचा श्रवण मिलिंद जाधव तृतीय, तर याच शाळेचा दक्ष शामराज सकपाळ यास उत्तेजनार्थ पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात वाचनालयातील ग्रंथालय कर्मचारी मंजुश्री नगरकर आणि तलाठी यांनी स्पर्धा व सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

Exit mobile version