अतिवृष्टीमुळे काळ नदीला महापूर

पुलाचे लोखंडी कठडे गेले वाहून

। माणगाव । प्रतिनिधी ।

जिल्ह्यात गेली आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले असून नद्यांना महापूर आला आहे. तसेच, भात शेती पाण्याखाली गेली आहे. या अतिवृष्टीचा बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच माणगाव तालुक्यातील कोशिंबळे गावाजवळून जाणार्‍या काळ नदीला महापूर आल्याने या नदीवरील बंधार्‍यावर उभारण्यात आलेल्या पुलाचे संरक्षित लोखंडी कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. यामुळे या मार्गावरून येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून पाच गावांचा संपर्क तुटला आहे.

गुरूवारी (दि.25) रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास काळ नदीला महापूर आला आणि या पुराच्या पाण्यात कोशिंबळे-निजामपूर मार्गावरील 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या धरणाच्या पुलावरून पुराचे पाणी गेल्याने लोखंडी संरक्षित कठडे वाहून गेले आहेत. या कठड्यामुळे कोशिंबळे व त्या परिसरात असणारी कोशिंबळे, कोशिंबळे आदिवासीवाडी, भिंताड, पानसई, इंदापूर यासह चार ते पाच गावांचा संपर्क तुटला आहे. या मार्गावरून ये-जा करणारे प्रवासी तसेच विद्यार्थी व नागरिकांना या पुलावरून जाताना धोका उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने हे संरक्षित कठडे ताबडतोब बांधावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Exit mobile version