रात्रीच्या वेळी वायू प्रदूषणात वाढ
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
सिडकोने नागरिकांच्या राहण्यासाठी कामोठे वसाहत वसवली आहे की नागरिकांच्या आरोग्यावर होणारा वायू प्रदूषणाच्या परिणामाची चाचणी करण्यासाठी गॅस चेंबरची निर्मिती केली आहे, असा संतप्त सवाल वसाहतीमधील नागरिक व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही वायू प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही पावले प्रदूषण नियंत्रण मंडळ उचलत नसल्याने माणसे मेल्यावरच महामंडळाला कदाचित जाग येणार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आपल्या मुलाबाळांचं राहणीमान उंचवावं, त्यांना आरोग्याच्या प्रश्नांना सामोरे जावे लागू नये, या हेतूने अनेकांनी कामोठेसारख्या सिडकोने वसवलेल्या वसाहतीत कर्ज काढून घरे खरेदी केली आहेत. सद्यःस्थितीत मात्र नागरिकांनी घरे खरेदी करताना ठेवलेल्या अपेक्षा भंग पावल्याचे पाहायला मिळत आहेत. वसाहतीत रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात हवेतील प्रदूषण होत आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वसाहतीमधील खाडी किनारे असलेल्या भागातील नागरिकांना यामुळे डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उलट्या होणे यासारख्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांचे जीवन असह्य झाले असल्याचा आरोप करत प्रदूषण करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार केली असता काही दिवस या त्रासातून मुक्तता होते. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा असले प्रकार सुरु होत असल्याचे पाहायला मिळते.
अमोल शितोळे, अध्यक्ष, शेकाप कामोठे शहर