| उरण | प्रतिनिधी |
गेले 28 दिवस पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या करंजा सात पाड्यातील ग्रामस्थांनी बुधवारी उरण तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. कामगार नेते भूषण पाटील व निमंत्रक सीताराम नाखवा यांच्या नेतृत्वाखाली चारफाटा येथून तहसीलदार कचेरी येथे नेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते काका पाटील, शेकाप शहर चिटणीस शेखर पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सीमा घरत, प्रदीप नाखवा, देविदास थळी, मनोहर कोळी, दिनेश म्हात्रे, सचिन डाऊर, कल्पेश जयेंद्र कोळी, लीलाधर कोळी, शिवदास नाखवा, ग्रामस्थ व नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिंदे, एमआयडीसी चे रवींद्र चौधरी, गटविकास अधिकारी सी.एम.राजपूत, सिडको अधिकारी ऋषी नाईक, ग्रामसेवक दिलीप तुरे आदींनी मोर्चेकर्यांसमवेत चर्चा केली. यावेली यावेळी भूषण पाटील ,सीताराम नाखवा संदीप पाटील संतोष पवार एल पाटील हेमलता पाटील कुसुम पाटील कमला म्हात्रे वैष्णवी पाटील यांची भाषणे झाली.मोर्चेकर्यांची तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामसेवक,एमआयडीसी,सिडको अधिकर्यांची तहसील दालनात बैठक घेण्यात आली.
यावेळी अनधिकृत कनेक्शनवर सात दिवसात कारवाई करणे, टँकरने पाणी पुरवठा सुरळीत करणे, हेटवणे धरणाचे पाणी पुरवठा सुरू करण, 12 बोअरवेल साठी परवानगी, सिडको व पाणीपुरवठा सुरळीत कऱणे, एमजेपीमार्फत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे लेखी आश्वासन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी ग्रामस्थांना दिले. या संदर्भात एका महिन्यात संबंधित सर्व विभागांचा आढावा बैठक घेण्यात येईल यावेळी जर पाणी पुरवठा नियमित झाला नाही तर ग्रामपंचायतीला घेराव घालण्यात येईल असे भूषण पाटील यांनी सांगितले.