| मुंबई | प्रतिनिधी |
बारसू येथे उभारण्यात येणार्या रिफायनरी प्रकल्पाबाबत समज आणि गैरसमज जे असेल ते लोकांसमोर ठेवा. आमच्या सरकारचं हेच धोरण होतं. तेच धोरण तुम्ही राबवा. चांगले प्रकल्प राबविण्यासाठी तुम्हाला लोकांना अटक करण्याची गरज का पडते, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
बारसू येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्ष पदाधिकार्यांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, नाणार आणि बारसूबाबतची माझी जी भूमिका होती ती माझी नव्हे तर जनतेची भूमिका होती. असे त्यांनी स्पष्ट केले.
राजापूरच्या एका कार्यक्रमात मला काही स्थानिक लोकांनी नाणारबाबत आंदोलनासाठी पाठिंबा मागितला. त्यामुळे आम्ही नाणारला विरोध केला. त्यावेळी रोजगार मिळेल, शुद्धीकरण रिफायनरी होईलं, असं मला सांगण्यात आलं. त्यानंतर बारसूची जागा समोर आली. त्यामुळे मी बारसूची जागा सुचवली, असेही ते म्हणाले. मात्र बारसूच्या जागेसाठी आता जबरदस्ती होतेय. लोकांच्या भल्याचा प्रकल्प असेल तर जबरदस्ती करण्याची वेळ का येते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच लोकांना सांगा, प्रकल्प नेमका काय आहे, त्यांचे समज आणि गैरसमज दूर करा. रोजगाराविषयी सांगा, असं आवाहनही त्यांनी सरकारलं केलं.
राष्ट्रवादीचा विकासाला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासाला कदापि विरोध नव्हता आणि भविष्यातही विरोध असणार नाही. मात्र पर्यावरणाचा र्हास होणारे प्रकल्प कोकणात नकोत, अशीच आमची भूमिका राहिलेली आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.