सिडको, एमजेपी अधिकार्यांच्या संयुक्त बैठकीत उहापोह
पनवेल संघर्ष समितीचा सामाजिक कामांचा रेटा सुरुच
। पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेलला खड्ड्यांच्या रस्त्याप्रमाणे पिण्याच्या पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत आहे. सिडको महिला मोर्चा अथवा गटांना गोल गोल फिरवून वेळ मारून नेत आहे. यासंदर्भात नवीन पनवेलच्या काही महिलांनी तक्रार करताच पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सिडको अधिकार्यांना धारेवर धरत तात्काळ दुरुस्ती आणि नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आठवड्याची मुदत दिली आहे.
सोमवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामाठे आणि कळंबोली शहरातील दुर्गाशक्तीचा आदर करुन पाणीप्रश्नावर सिडको आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) अधिकार्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सिडको अधिकार्यांना खडे बोल सुनावून तात्काळ उपाययोजना करून पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. ही बैठक जवळपास दोन तासांहून अधिक काळ चालली.
एमजेपीचे अधीक्षक अभियंता व्ही.के. सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता के.बी. पाटील, सिडकोचे विभागीय अधिकारी सुनील जगदाळे, तर संघर्ष समितीकडून अध्यक्ष कांतीलाल कडू, नवीन पनवेल अध्यक्ष भूषण साळुंखे, पनवेल लाईन आळी अध्यक्ष हरेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष निर्मला चौधरी, करंजाडे अध्यक्ष मंगल भारवाड, उपाध्यक्ष किरण करावकर, रामाश्री चौधरी, निलेश पाटील, कडू यांचे स्वीय सहाय्यक भास्कर बगाडे आदी मान्यवर बैठकीला उपस्थित होते.
नवीन पनवेल शहरातील सेक्टर 12, 13, बी -10, सी-5, सी – 6, सेक्टर 18 मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर कांतीलाल कडू यांच्याकडे लेखी स्वरूपात आल्या आहेत. त्या अनुषंगाने सिडको आणि सिडकोला तब्बल 98 एमएलडी पाणी दररोज पुरवठा करणार्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांची बैठक कडू यांच्या मागणीनुसार आयोजित करण्यात आली होती. त्यात नवीन पनवेलमधील एकूण विविध 19 सेक्टर, खांदा कॉलनी, कामोठे आणि कळंबोलीत पाणीपुरवठा का सुरळीत होत नाही यावर खल काढण्यात आला.
नवीन पनवेलला सध्या भेडसावत असलेल्या पाणीप्रश्नावर मार्ग काढताना जुने व्हॉल्व बदलून टाकण्याची मागणी करण्यात आली. त्याशिवाय जुन्या जलवाहिन्या बदलणे आणि शहरातील जलकुंभ बांधण्याची मागणी कडू यांनी रेटून धरली. त्यामुळे भविष्यात नवीन पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी आणि कळंबोली शहरातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत टंचाईग्रस्त गृहासंकुलाची माहिती संकलित करून त्यांच्या मागणीनुसार सिडकोने विनामूल्य, तातडीने पाणीपुरवठा करावा, असा धोशा कांतीलाल कडू यांनी लावला.
नवीन पनवेल सेक्टर 12 आणि 13 मध्ये सकाळी आणि संध्याकाळी फक्त एक-एक तास कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा रोग जडला आहे.
– भूषण साळुंखे, अध्यक्ष, पनवेल संघर्ष समिती नवीन पनवेल
शहरात जलकुंभ उभारणे आणि जुन्या जलवाहिन्या बदलण्याची नितांत गरज असल्याने त्या प्रस्तावाला वरिष्ठ अधिकार्यांच्या शिफारसीची गरज आहे. हा धागा पकडून सिडकोचे पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रणित मूळ यांच्या सिडको भवनातील दालनात सोमवारी (दि. 3) दुपारी 3 वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. सिडको, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका अभियंत्यांची संयुक्तीक बैठक घेण्यात येणार आहे.
– कांतीलाल कडू, अध्यक्ष, पनवेल संघर्ष समिती