रायगडसह ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गात उष्णतेची लाट
| रायगड | खास प्रतिनिधी |
राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आली असून, हवामान विभागाकडून कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात प्रत्येक जिल्ह्यात उष्णतेचा प्रकोप वाढताना दिसत आहे. त्यामध्ये कोकण अधिक होरपळून निघत आहे. 23 ते 27 एप्रिल अशा सलग पाच दिवस कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणासाठी पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी वावरताना विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणामध्ये अचानक बदल झाला आहे. उष्णतेची तीव्रता एप्रिल महिन्यात अधिक असल्याचे जाणवत आहे. पुढील पाच दिवस अशीच परस्थिती राहणार आहे. त्यानंतर तापमान हळूहळू कमी होईल. तीव्रता जरी कमी झाली, तरी उष्णता राहणार आहे. त्यामुळे कोकणात ऑरेंजऐवजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात 23, 24 आणि 25 एप्रिल या कालावधीत वातावरण सामान्य राहणार असून 26 आणि 27 एप्रिलरोजीसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनीदेखील सर्तक राहणे गरजेचे आहे.
दुपारी 12 ते 4 वाजताच्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडू नये, पुरेसे पाणी घ्यावे, उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना केले आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात प्रचार युद्ध भडकले आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे उमेदवारांच्या प्रचारावर विपरीत परिणाम होत आहे. दुपारी उन्ह अधिक असल्याने कार्यकर्त्यांना सायंकाळी पाचनंतर प्रचाराला बाहेर पडावे लागत आहे.
कोकणाबरोबरच मध्यमहाराष्ट्रातील दक्षिण जिल्ह्यांमध्ये म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच विदर्भ, मराठवाडा ह्या सगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे. वातावरणातील आदर्ता कमी झाल्यामुळे उष्णता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि राजस्थानकडून उष्ण आणि कोरडे वारे वाहू लागले. त्यामुळे वातावरणातील आदर्ता वाढल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.