। रसायनी । वार्ताहर।
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 146व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वत्र कार्यक्रमाचे आयोजन ठीक ठिकाणी करण्यात आले होते.
शिरढोण येथील भरत भोईर, दीपक पाटील, रुपेश मुकादम यांच्या पुढाकाराने शेकडोहून अधिक तरुणांनी सिद्धगड ते शिरढोण क्रांतिवीर ज्योत काढण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी बलिदान दिले ते हुतात्मा वीर भाई कोतवाल व वीर हिरुजी पाटील यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिद्धगड येथील क्रांतीस्तंभाला अभिवादन करून क्रांतिवीर ज्योत शिरढोणच्या दिशेने निघाली. यावेळी ठिकठिकाणी या क्रांतिवीर ज्योतीचे स्वागत करण्यात आले. ही क्रांतिवीर ज्योत बारवई पुलावर आली असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा सचिव रसायनी वृंदावन येथे राहणारे अविनाश पडवळ, विभागीय अध्यक्ष दशरथ मते व मनसेच्या कार्यकर्त्यांनी क्रांतिवीर ज्योतीचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी सर्व क्रांतिवीर ज्योती मध्ये सहभागी झालेल्यांना मनसेचे रायगड जिल्हा सचिव अविनाश पडवळ यांनी पाणी व थंड पेयाची व्यवस्था केली होती. पडवळ यांनी केलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मंडळाच्या पदाधिकार्यांनी त्यांचे सन्मान चिन्ह देऊन गौरव करत अविनाश पडवळ यांचे आभार मानले.