काही नातेवाईक बापाला म्हणायचे, पोरगी हुशार आहे. तिचं नुकसान करू नकोस. तालुक्याच्या शाळेत नाव घाल. माझ्या शेजारचे काही मुलंही तालुक्याच्या ठिकाणी शिकायला गेले. पण, बापाजवळ पैसे नव्हते. इतक्या लहान मुलीला तालुक्याच्या ठिकाणी कसं ठेवणार? हा प्रश्नही होताच. पोरगी इंग्रजी शाळेत शिकली नाही याचं बापाला कधीच वाईट वाटलं नाही. त्यामागे कारण होतं, माझी जिल्हा परिषदेची शाळा आणि शाळेतील शिक्षक. म्हणून जिल्हा परिषदेची शाळा हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच झालं. या शाळेतील शिक्षकांची पोरंही आमच्याच शाळेत शिकली. कदाचित मी तालुक्याच्या ठिकाणी शिकायला गेले असते, तर मला जिल्हा, राज्य स्तरावर जाऊन वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत सहभागी होता आलं नसतं. माझ्यामध्ये ती स्टेज डेरींगच आली नसती. स्टेजवर उभं राहून कसं बोलायचं, स्क्रीप्टींग कशी करायची इथपासून सर्वच या शाळेनं मला शिकवलं. फक्त मीच नाहीतर आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्टेज डेरींग निर्माण करण्याचं काम या शाळेनं केलंय. कुठल्याही स्पर्धेत भाषणासाठी पोरांची इतकी नाव असायची की दुपारी 2 वाजता सुरू झालेला कार्यक्रम सायंकाळी साडेपाचला संपायचा. वेळेअभावी अर्ध्या पोरांची भाषणं व्हायची नाही. परिस्थिती नसल्यानं दहाव्या वर्गात काही विषयांच्या गाईड घेतल्या नव्हत्या. त्यावेळी स्वतःच्या पैशातून गाईड आणून देणारा शिक्षकही याच शाळेत मला पाहायला मिळाला. दहावीनंतर अकरावी-बारावीला खासगी शाळेत शिकले. त्या शाळेत पहिल्यांदाच वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला आणि थेट जिल्हा स्तर गाठलं आणि तिथूनही शाळेला बक्षीस मिळवून दिलं. तेव्हा तिथले एक शिक्षक म्हणाले, ‘जिल्हा परिषदेची मुलगी असून इतकी मोठी झेप, आश्चर्य आहे’. मी म्हटलं, ‘सर मला तुमच्या शाळेनं फक्त संधी दिली. मी घडले ते माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतच. त्यांनी लहानपणापासून माझ्यामध्ये स्टेज डेरींग निर्माण नसती केली तर आज मी इथं नसते.’ तेव्हा मला जाणवलं, की सरकारी शाळांना लोकं कोणत्या नजरेनं बघतात? ही उपेक्षा आमच्या वाट्याला का आली? कारण माझ्या शाळेला तर नावच नव्हतं. मी फक्त जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी होते. आमच्यावर अशा प्रसिद्ध आणि नावाजलेल्या शाळेचा शिक्का नाही. तुमच्यापैकी कोणालाही विचारलं तर तुम्ही सांगाल मी या या शाळेचा विद्यार्थी आहे. पण, आमचं एकच असतं जिल्हा परिषदेची शाळा. सांगायचा मुद्दा इतकाच की, कोणी सरकारी शाळांबाबत काहीही विचार केला तरी जिल्हा परिषदेची शाळा ही गरीबांच्या मुलांसाठी नेहमीच जिव्हाळ्याची आहे. कारण, त्या शाळेशिवाय गरीबांच्या मुलांना पर्याय नसतो. गावात शाळा नसेल किंवा ती बंद झाली तर प्रत्येकच बाप आपल्या मुलाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा दूर असलेल्या शाळेत शिकायला पाठवेल असं नाही. पाटलांचे मुलं शिकतीलही. पण, गरीबाचा मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहिल. आमच्या शाळेत शेजारच्या गावातली पोरंही शिकायला येतात. 1-2 किलोमीटर अंतर असल्यानं त्यांना येणं-जाणं सहज शक्य होतं. पण, पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद केल्या तर आम्ही गरीबांच्या मुलांनी कुठं जायचं? की परत त्यांनी शेळ्या-मेंढ्या चारायच्या?
– भाग्यश्री राऊत