मधुरा कुलकर्णी
आयुष्यभर दीनदुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेमहाराज. त्यांनी समाजात मिसळून जनमानसाला शहाणं करण्याचा प्रयत्न केला. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करु नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथीपुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका हे सांगत ते गावोगाव फिरले. मंगळवारी त्यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने नव्याने करुन दिलेला हा परिचय.
वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर जगताना व्यक्तीनं कोणते निकष पाळावे, वैचारिक, शारीरिक आणि सार्वजनिक शुचिता कशी पाळावी यासंबंधी अनेकांनी मार्गदर्शन केलेलं असलं तरी संत गाडगेबाबा यांनी हे सांगण्यासाठी चोखाळलेला मार्ग आजच्या काळासाठीही सुयोग्य आणि प्रभावी ठरणारा आहे. म्हणूनच त्यांची पुण्यतिथी साजरी करताना त्यांच्या विचारांचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. संत गाडगेबाबांनी समाजप्रबोधनासाठी मार्गदर्शन केलं हे खरं असलं तरी ‘आधी केले मग सांगितले,’ अशी त्यांची शैली होती. आजकाल उंटावरुन शेळ्या हाकणार्यांची संख्या मोठी असताना स्वत: हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ करणारा, सभेपूर्वी सगळं प्रांगणं लख्ख करणारा, श्रोत्यांशी साध्या-सोप्या भाषेमध्ये संवाद साधत, रोजच्या जगण्यातले संदर्भ देऊन विषयाचं स्पष्टीकरण देणारा हा साधासुधा संत होता. मानमरातब, पैसा, प्रतिष्ठा आदींच्या बेगडी महिरपीमध्ये न अडकणारा तो थोर समाजसुधारक होता. म्हणूनच आजही त्याची छबी एखाद्या चौकटीपुरती नव्हे तर सामान्यजनांच्या मनामध्ये ठसलेली आहे. त्यांनी जनसामान्यांशी संवाद साधून अन्याय्य प्रथा-परंपरा, चुकीचे रिवाज, अस्वच्छता, फसवेगिरी आदींवर जहरी प्रहार केले. आपल्या साध्या राहणीचा आणि उच्च विचारांचा ठसा उमटवून साध्याभोळ्या जनांच्या विचारांना चालना देण्याचं आणि त्यांना कार्यप्रवण करण्याचं मोठं काम त्यांनी करुन ठेवलं. स्वत:चं स्तोम माजवणार्यांचा, व्यक्तिपूजेचा धिक्कार करणारं हे व्यक्तिमत्त्व होतं. आज दुर्मिळ होऊ पाहणारे हे सगळे स्वभावविशेष आहेत. म्हणूनच या महात्म्याची पुण्यतिथी साजरी करणं म्हणजे माणसाला उत्तमोत्तम घडवणार्या मूल्यांचा पुरस्कार करण्यासारखं आहे.
20 डिसेंबर रोजी या आधुनिक संताने अखेरचा श्वास घेतला. डोईवर मडकं आणि हाती खराटा घेतलेला हा महात्मा, एक संन्यासी, आयुष्यभर समाजजागृती करत राहिला. दीनदुबळे, अपंग, अडाणी यांच्यासाठी चेतवलेल्या त्यांच्या कर्मयज्ञात या दिवशी शेवटची आहुती पडली. आयुष्यभर गोरगरीब, दीनदुबळे, अनाथ, अपंग यांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेमहाराज. त्यांनी समाजात मिसळून जनमानसाला शहाणं करण्याचा प्रयत्न केला. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करु नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथीपुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका हे सांगत ते गावोगाव फिरले. दगडाच्या मूर्तीत नव्हे तर माणसांमध्ये, रंजल्या-गांजल्यांमध्ये देव शोधण्याची शिकवण देणारा हा महात्मा होता. एक संसारी, चार मुलींचा पिता असणार्या या गृहस्थाने नंतर संन्यास घेतला आणि सगळं आयुष्य भ्रमंतीत घालवलं. ही भ्रमंती स्वसुखासाठी नव्हती तर जनशिक्षणासाठी होती. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी. कानात कवडी, दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू आणि दुसर्या हातात मडकं अशा वेशातला हा भणंग संत जाईल तिथला परिसर स्वत:च्या हाताने स्वच्छ करायचा. आधी कीर्तन-प्रवचनाची जागा लख्ख करायचा आणि त्यानंतर जनांना बोधामृत द्यायचा. ‘आधी केले मग सांगितले’ हा मंत्र पाळणारा हा महात्मा होता. संत तुकारामांना गुरू मानणार्या या संताने कायमच माणसातील देवाची पूजा केली. त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम आणि विद्यालये सुरू केली. त्यांनी आपल्या प्रवचनांमध्ये बुवा-बाबांवर प्रखर प्रहार केले. पशुबळी देणार्यांची घोर निंदा केली. त्यांचे उपदेश साधे-सोपे असत. जमलेल्यांना मार्मिक प्रश्न विचारुन, त्यांच्या उत्तरातूनच अज्ञानाची, दुर्गुणांची जाणीव करून देऊन ते शहाणपणाचे चार शब्द सुनावत असत.
आपल्या या कार्यातून त्यांनी सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वं समाजात रुजवली आणि सातत्याने सक्रिय राहून जीवापाड जपली. आयुष्य सुकर, सहज आणि सौंदर्यासक्त करण्याच्या हेतूने त्यांनी मांडलेली समीकरणे कळायला साधी आणि माणसाच्या मूलभूत प्रश्नांना हात घालणारी आहेत. दशसूत्रींद्वारे त्यांनी ही मूल्ये समाजात खोलवर रुजवली. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, बेकारांना रोजगार, पशु-पक्ष्यांना आणि मुक्या प्राण्यांना अभय, दु:खी आणि निराश जनांना हिंमत आणि गोरगरिबांना शिक्षण अशी समीकरणं जुळली तर समाजातील बहुतांश प्रश्न निकाली निघतील, अशी त्यांची धारणा होती आणि याच धारणेने ते आयुष्यभर कार्यरत राहिले. ‘तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी।’ असं ते म्हणतात तेव्हाच त्यांच्यातील सज्जन माणसाची प्रचिती येते. आजही त्यांच्या या विचारधारेची समाजाला गरज आहे. अमरावतीतील शेणगावमध्ये जन्मलेली डेबुजी झिंगराजी जानोरकर या मूळ नावाची एक संसारी व्यक्ती ‘थोर संत’ असा नावलौकिक मिळवून जगाचा निरोप घेते तेव्हा या संतपणाची किंमत त्यांनी मोजलेली असते. गाडगेमहाराजांनीही ती मोजली. लोकांची अपार अवहेलना झेलली पण कालांतराने लोकांना त्यांचे विचार पटले. त्यांचा शिष्यवर्ग तयार झाला. पाया पडणार्यांच्या पाठीत हातातील काठीचा फटका मारून त्यांनी शिष्यांना कार्ययज्ञात सहभागी करुन घेतलं.
गाडगेबाबांच्या विचारप्रणालीत व्यक्तिपूजेचं नव्हे तर वैचारिक मूल्यांचं अधिष्ठान होतं. समाजसुधारणेची तळमळ होती. अज्ञानमुक्त समाजाची आस होती. म्हणूनच निसर्गनियमानुसार काळाच्या पडद्याआड गेले तरी त्यांचे विचार अजरामर आहेत. येणार्या पिढ्यांना अशा लोकोत्तर माणसांच्या विचारांचं धन वैचारिकदृष्ट्या संपन्न करत जातं. 20 डिसेंबर 1956 हा गाडगेमहाराजांचा मृत्यूदिन. संत या पदापर्यंत पोहोचणार्या, सामान्यातील असामान्य असणार्या या व्यक्तीने या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्या दिवशी स्वच्छतेची कास धरणारा एक देह पंचतत्त्वात विलीन झाला, पण त्यांनी दिलेले विचार मनामनात रुजले का, हा खरा प्रश्न आहे. एखादी व्यक्ती स्वहित, स्वार्थ बाजूला ठेवून समाजाप्रती अवघं आयुष्य समर्पित करते तेव्हा तिच्या कष्टाचं चीज होणं अपेक्षित असतं. केवळ गाडगेबाबाच नव्हे तर अनेकांनी असे प्रयत्न केले आहेत. असं असताना आज नव्याने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचं आव्हान करावं लागतं ही समाजाची अपात्रता म्हणायला हवी. समाजात राहताना प्रत्येकाची काही कर्तव्ये असतात. सर्व समाजपुरुषांनी या कर्तव्यांचं पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कदाचित त्यांच्या काळात अनुयायांनी आणि त्या विचारांनी भारलेल्या समुहाने त्या पाळल्याही असतील, मात्र वर्तमानानेही त्यापासून धडा घ्यायला हवा. महापुरुषांच्या जयंती अथवा पुण्यतिथीनिमित्त मोठे दिखाऊ समारंभ न करता त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची खरी गरज आहे.
आज आपल्यापुढे अस्वच्छतेचा ब्रह्मराक्षस ‘आ’ वासून उभा आहे. आधीच डबकी झालेल्या नद्या प्लास्टीकच्या कचर्याने गुदरमत आहेत. कोणत्याही गावात-शहरात जा, भरुन वाहणार्या कचरा पेट्या सहज दृष्टीला पडतात. एकीकडे ‘देस बदल रहा है’ ही घोषणा कानी पडत असताना दुसरीकडे भरुन वाहणारे उकिरडे आणि त्यावर सुखनैव संचार करणारी जनावरं नजरेला पडतात. हे दृष्य विरोधाभास जाणवून देणारं आहे. आपले घर स्वच्छ करणारे महाभाग ती सगळी घाण रस्त्यात आणून टाकत असतील तर परिसर कसा स्वच्छ राहणार? सार्वजनिक वाहने, देवस्थाने, तीर्थक्षेत्र, कुंड आदी प्रत्येक ठिकाणी ही अस्वच्छता दिसते. काही समाजसेवी संस्था आणि व्यक्ती याविरुद्ध एकांडा लढा देत असतात, सरकारी यंत्रणा आपल्या गतीने समाजप्रबोधन करत असते पण समाजाची विचारधारा बदलत नाही तोपर्यंत या कशाचाही उपयोग नाही. ‘येथे थुंकू नये’ या पाटीखालीच लोक पिचकार्या मारत असतील तर कोणाला आणि काय बोलणार? कायद्याने शिस्त निर्माण करता येते हा एक गैरसमज आहे. शिस्त, स्वच्छता ही कृती नव्हे तर विचार आहे. तो मनात रुजला तरच प्रत्यक्षात येतो आणि प्रत्यक्षात आला तरच भवताल प्रसन्न आणि देखणं होऊ शकतं. म्हणूनच निर्मळतेतील सौंदर्य शोधायला हवं. प्रत्येक गोष्टीत सौंदर्यदृष्टी राखायला हवी. ही वसुंधरा विलोभनीय आहे. तिच्या सौंदर्याचा मान राखायला हवा. आपली हीच कृती पूर्वजांच्या कर्मांचा यथोचित गौरव ठरेल.






