बळवंत वालेकर
रायगड जिल्हा डोंगर, दर्याखोर्यांनी वेष्टिलेला जिल्हा आहे. पश्चिमेेस अरबी महासागर, पूर्वेस सह्यगिरीची शिखरे, उत्तरेस मुंबई व रत्नागिरी जिल्हा असून हा जिल्हा लांबोळका आहे. येथे 350 मिलीमीटर पेक्षा जादा पाऊस पडतो. (अलिकडे हे प्रमाण वाढलेले आहे.) जादा पाऊस ,जमिनीचा भुसभुशीतपणा, डोंगरांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष यामुळे या जिल्ह्यात तळई सारखे दुर्धर प्रसंग घडले. व होत्याचे नव्हते झाले. आता या गावाची नावनिशाणी शिल्लक राहिली नाही .
या जिल्ह्याचा इतिहासही जागृत आहे. शिवछत्रपतींच्या राजधानीमुळे रायगड किल्ला तसेच सरखेल कान्होजी राजांच्या राजधानीमुळे कुलाबा किल्ला इतिहास प्रसिद्ध झाला आहे. तसेच या जिल्ह्यात हिमालयाची उंची गाठणार्या व्यक्ती जन्मल्या आहेत. त्यांचे कर्तृत्व महाराष्ट्रापुरते सीमित नाही तर ते भारत देशालाही गवसणी घालते. यात क्रांतिकारक, समाजधूरिण,शिक्षणतज्ज्ञ, इतिहास तज्ज्ञ, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचाही समावेश होतो. त्यांचा जन्म महाड तालुक्यातील बिरवाडी येथे दिनांक 5 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांची 121 वी जयंती आज दि. 5/8/ 2021 रोजी असून ती विविध उपक्रमांनी साजरी होईल. म.म. दत्तोपंत संस्कृत तज्ज्ञ, विविध भाषांवर प्रभुत्व असलेले, फर्डे वक्ते, अमोघ वाणी, प्रगल्भ बुद्धी व हजरजबाबी होते. गळ्यापासून खाली ओळीने बटणे असलेला लांब शेरवानी कोट, दोनही खांद्यांवरुन पुढील बाजूस नीट नेटकेपणाने आलेले उपरण्याचे पदर, विशाल व भव्य कपाळावरील गंधरेखा आणि चेहर्यावरील सदोदित वावरणारी प्रसन्नता असल्यामुळे ते महाराष्ट्रास सुपरिचित होते.
प्रा. पोतदार यांचा जन्म बिरवाडी येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव ‘ओरपे’. पण त्यांचे पूर्वज आदिलशाहीमध्ये पोतदार (खजिना रक्षक) होते. तेथे प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने काम केल्यामुळे पोतदार हे नाव सर्वत्र परिचित झाले. म्हणून ओरपे ऐवजी ‘पोतदार’ हेच आडनाव त्यांनी धारण केले. अगाध बुद्धिमत्ता लाभलेल्या दत्तो पंतांचे भविष्य त्यांच्या वडिलांनी जाणले होते म्हणून त्यांना पुणे येथील नू. म. वि. या सुप्रसिद्ध शाळेत दाखल केले. एकपाठी असलेल्या दत्तोपंतांनी पहिला क्रमांक सोडलाच नाही. तेथे त्यांना प्रज्ञावंत शिक्षकांची साथ मिळाली. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. तेथेही त्यांना प्रज्ञावंत प्राध्यापक लाभले. त्यामुळे त्यांच्या इंग्रजी, संस्कृत, उर्दू या भाषा परिपक्व झाल्या. ते वाक्स्पर्धेत प्राथमिक शाळेपासून भाग घेत असल्यामुळे पट्टीचे वक्ते बनले. मातृभाषेवर त्यांचे नितांत प्रेम होते. इंग्रजीसह अनेक भाषांवर त्यांंचे प्रभुत्व होते. पण मातृभाषेच्या स्वाभिमानामुळे मराठी भाषेत लिहिताना अगर बोलताना ते एकही अन्य भाषेतील शब्द वापरत नसत. मातृभाषेप्रमाणे राष्ट्रभाषा हिंदी, अनेक भाषांची जननी संस्कृत तसेच जागतिक भाषा इंग्रजी यांची खोली व उंची त्यांनी वाढविली. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. सत्य व वास्तव इतिहास वाचकांपर्यंत पोचण्यावर त्यांचा कटाक्ष होता. विविध काळात घडलेल्या इतिहासाचे सखोल वाचन करून त्यांनी पुरावे शोधले.
पुराण कालीन वास्तु किल्ले, राजवाडे इत्यादींना भेट देऊन संबंधितांशी चर्चा करीत. अशाप्रकारे ते वास्तववादी इतिहास समोर ठेवीत. वास्तववादी इतिहासाचे पाईक म. म. दत्त्तोपंत पोतदार वस्तुस्थितीवर आधारित, टीका टिपणी विरहित व पुराणकालीन दाखल्यांची जोड असलेला तसेच धर्मा धर्मातील तेढ दूर करणारा इतिहास जनतेसमोर यावा व इतिहास विषयाबाबत आवड निर्माण होण्यासाठी त्यांनी ‘आधुनिक इतिहास भारतीय परिषदेची’ (मॉडर्न इंडिया हिस्ट्री कॉन्फरन्स) स्थापना केली. पुणे व दिल्ली येथे या परिषदेची अधिवेशने भरविली. मराठे व मुघलांबाबतच्या गाढ्या अभ्यासाने त्यांना चांगली साथ दिली. त्यांच्या या कार्याची नोंद भारत सरकारने घेतली आणि इतिहास विषयाच्या या तौलनिक अभ्यासकास ‘भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाचे’ सन्माननीय सदस्यत्व बहाल केले.
‘संयुक्त महाराष्ट्राचेखरे शिलेदार’
महामहोपाध्याय पोतदार यांनी भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे चिटणीसपद त्यानंतर कार्याध्यक्षपद भूषविले. मातृभाषा म्हणून मराठी वर त्यांचे मातृवत प्रेम होते. प्रत्येक विद्यार्थ्यांस मातृभाषेतून शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता. मराठी भाषिकांचा महाराष्ट्र प्रांत निर्माण व्हावा, मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळावा, मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर महाराष्ट्र राज्याची राजधानी व्हावी तसेच राज्याचा सर्व कारभार मराठी भाषेतून चालावा या मागणीसाठी ते सक्रीय झाले. सभा, संमेलने व चर्चासत्रे यांच्यामार्फत लोक प्रबोधन करू लागले.1955-56 सालच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झाले. एस.एम.जोशी, ना.ग.गोरे, आचार्य अत्रे , एस् . ए. डांगे इ.नी उभारलेल्या लढ्यात ते अग्रभागी राहिले. न्याय्य हक्कांसाठी व्याख्यानांची सरबत्ती सुरू केली. म्हणून प्रा. पोतदार यांना ‘संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्षपद’ बहाल करण्यात आले. वृत्तपत्रांनी या चळवळीस भरभरुन प्रसिद्धी दिली. हा प्रश्न केंद्र शासनाने त्वरित सोडविण्यासाठी महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींचे राजीनामा सत्र सुरू झाले. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री व त्यावेळच्या कुलाबा जिल्ह्याचे खासदार डॉ. सी. डी.देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा सर्वप्रथम राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. त्याचा पुरेपूर फायदा काँग्रेस विरोधकांनी उठविला. लगेचच (1957 ची) विधान सभा व लोकसभेची निवडणूक आली होती. ही निवडणूक संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बॅनरखाली काँग्रेस विरोधकात एकास एक उमेदवार उभा करून लढवावी असे ठरले. त्याचा जबरदस्त फटका काँग्रेस पक्षाला बसला. काँग्रेसचे रथी महारथी कोसळले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण कराड विधानसभा मतदार संघातून निसटत्या बहुमताने विजयी झाले. त्यावेळच्या महाद्विभाषिक मुंबई राज्यात गुजरात भाषिक विभाग मोडत होता. तेथे काँग्रेस उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाल्यामुळे मुंबई राज्यात काँग्रेसचे बहुमत झाले. आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री निवडले. पण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने उभारी घेण्यासाठी मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्यास अनुमती द्यावीच लागेल, हे तत्कालीन पंतप्रधान व काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जाणले. व 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबई शहर राजधानी झाली व मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळाला. यात दत्तो वामन पोतदार यांचा महत्त्वाचा भाग आहे.
‘अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’
प्राध्यापक पोतदार महाराष्ट्राचे पुराण पुरुष, महामहोपध्याय, साहित्य वाचस्पती, पत्रभूषण तसेच चतुरस्त्र पंडित होते. त्यांचे जीवन म्हणजे धगधगीत ध्येयनिष्ठा, कडकडीत त्याग व निस्पृह कर्मयोग यांचा त्रिवेणी संगम होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्राचा चालता बोलता इतिहास होय. त्यांनी विपुल लेखन केले. त्यांना डोळसपणे प्रवास करण्याची हौस होती. या हौसेपोटी त्यांनी भरपूर प्रवास केला. मराठी साहित्य परिषद व शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थांचे अध्यक्षपदही स्वीकारले. इंडियन हिस्टॉरिकल काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना मिळाला. पुणे विद्यापीठ तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांचे उपकुलगुरुपद भूषविण्याची संधीही त्यांना मिळाली. दत्तोपंत पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु असताना अलिबाग येथे जनता शिक्षण मंडळाचे ‘जे. एस. एम. कॉलेज’ 1961 साली चालू झाले. सदर महाविद्यालय पुणे विद्यापीठामार्फत सुरु करण्यासाठी प्रा. पोतदार यांचे मोठे सहकार्य लाभले. सदर महाविद्यालयाचे उद्घाटन जून 1961 मध्ये पुणे विद्यापीठाचे तत्कालीन उपकुलगुरू द.वा. पोतदार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष तथा मुंबई विधानसभेचे माजी सभापती नानासाहेब कुंटे होते. सदर महाविद्यालय हे जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय असल्यामुळे या महाविद्यालयाचे शिक्षण प्रेमीनी स्वागत केले.
महामहोपाध्याय द. वा. पोतदार इतिहासाचे व शिव छत्रपंतीचे गाढे अभ्यासक शिव छत्रपतींचा वास्तववादी इतिहास जनतेसमोर येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘शिव चरित्र लेखनाची जबाबदारी’ प्रा. पोतदार यांच्यावर सोपविली. दत्तोपंतानी सदर जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारली आणि कामकाजास सुरूवात केली. चरित्र लेखनाचे काम अनेक महिने चालू होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. हे काम अंतिम टप्यात आले असतानाच दिनांक 6 ऑक्टोबर 1979 रोजी त्यांना इहलोक सोडून जावे लागले. मराठी भाषा शुद्ध लिहिणे, शुद्ध वाचणे तसेच या भाषेचा वापर शासनाच्या सर्व विभागांमध्ये करणे आणि इतिहासाचे सर्वत्र वास्तववादी वर्णन करणे हीच दत्तो वामन पोतदार यांना खरी श्रद्धांजली ठरेल.