महेश जोशी
1897 मध्ये भारतीय रस्त्यांवर पहिली कार धावली होती आणि 1901 मध्ये कार चालवणारे पहिले भारतीय जमशेदजी टाटा होते. 1942 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्तान मोटर्सने भारतात पहिले ऑटोमोबाईल तयार केले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने ऑटोमोबाईल निर्मितीला प्रोत्साहन देऊन या क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न केला. गेली दोन वर्षं संपूर्ण जग कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करत आहे. त्यामुळे काही काळासाठी अर्थचक्रं थांबली. मात्र त्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्राने पुन्हा एकदा भरारी घेतल्याने ऑटो सेक्टरमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. विशेषतः यावर्षी ऑटो सेक्टरमध्ये अनेक कंपन्यांनी विशेष फीचर्स असलेल्या आणि ग्राहकांना परवडणार्या गाड्यांची निर्मिती केल्याने ऑटोमोबाईल क्षेत्राची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात झालेल्या बदलांचा आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर, जनसामान्यांच्या जीवनशैलीवर काय परिणाम झाला याचा आढावा घेतला असता अनेक मुद्दे समोर येतात.
2019 मध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात संपूर्ण जगात भारताचं स्थान पाचवं होतं. जवळपास 35 दशलक्ष नोकरदार वर्ग ऑटोमोबाईल क्षेत्रावर अवलंबून आहे तर जीडीपीमधला या क्षेत्राचा सहभाग 7.1 टक्के आहे. त्याचबरोबर हा सहभाग 2026 पर्यंत 20 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांपासून ऑटोमोबाईल उद्योग जोमाने वाढत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. उत्पादन आणि विक्री या दोन्ही बाबतीत भारतीय ऑटो उद्योग जागतिक स्तरावर मोठं क्षेत्र बनला आहे. भारत आज जगातल्या सर्वात वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. ऑटोमोबाईल क्षेत्र 1952 मध्ये अस्तित्वात आलं. सरकारने या उद्योगाला स्वदेशी बनवण्याच्या उद्देशाने पहिला आयोग नेमला. 1952 मध्ये देशाला सर्वप्रथम प्रवासी कार्सची ओळख झाली आणि हिंदुस्तान मोटर्स, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स आणि स्टँडर्ड मोटर्स यासारख्या उत्पादकांना प्रसिद्धी मिळाली. तोपर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज, स्टँडर्ड मोटर्स यांनी एसयूव्हीसची निर्मिती करणं सुरु केलं. अशोक मोटर्स, सिंप्सन अँड कंपनी, प्रीमियर मोटर्स आणि त्यासारख्या सात कंपन्यांनी अवजड आणि मध्यम व्यापारविषयक गाड्यांची निर्मिती करणं सुरु केलं होतं. बजाज ऑटो, एस्कॉर्टस ग्रुप, रॉयल एनफिल्ड, ऑटोमोबाईल प्रॉडक्टस ऑफ इंडिया, आयडियल जावा इत्यादी कंपन्यांनी स्कूटर, मोटर बाईक किंवा मोपेड यासारख्या दुचाकी वाहनांचं उत्पादन सुरु केलं होतं.
आताही मंदीच्या काळामध्ये सर्वाधिक गवगवा झालेलं क्षेत्र म्हणजे ऑटोमोबाईल. परंतु, ऑटोमोबाईल क्षेत्रात खरोखर मंदी आहे का की ग्राहकांची आवड-निवड बदलली आणि त्याचा परिणाम या क्षेत्रावर होत आहे, याचा विचार केला पाहिजे. ‘ह्युंदाई’ने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध करत गेल्या वर्षीच्या तुलनेत 2018-19 मध्ये 21 टक्के अधिक नफा कमावल्याचं जाहीर केलं तसंच गाड्यांच्या विक्रीतही तीन टक्क्यांनी वाढ अनुभवली. ‘ह्युंदाई’ने सप्टेंबर महिन्यात 40 हजार 705 गाड्यांची विक्री केली तर ऑगस्टमध्ये ही संख्या 38 हजार, 205 इतकी होती, 2019 मध्ये निर्यात केलेल्या गाड्यांची संख्या 17 हजार होती. ‘मारुती-सुझुकीने’ही सप्टेंबर महिन्यात ऑगस्टच्या तुलनेत 18.5 टक्के अधिक विक्री केली. कोरोनाबाधितांची संख्या गेल्या महिन्यात घटल्याने तसंच टाळेबंदी मागे घेतली गेल्याने बाजारात उलाढाल वाढत आहे. त्याचा फायदा वाहन उद्योगालाही मिळत आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (एफएडीए)च्या मते, ऑगस्ट 2021 मध्ये वाहन नोंदणीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.48 टक्के वाढ झाली. अर्थात कोरोनापूर्व काळातल्या मागणीपेक्षा ही मागणी कमी आहे.
ऑगस्टमध्ये प्रवासी वाहनं, दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांसह सर्व विभागांमधल्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली. गेल्या महिन्यात देशभरात एकूण 13 लाख 84 हजार 711 वाहनांची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात 12 लाख नऊ हजार 550 वाहनं विकली गेली होती. ऑगस्टमध्ये व्यावसायिक वाहनांना सर्वाधिक फायदा झाला. या श्रेणीमध्ये 53 हजार 150 वाहनांची नोंदणी करण्यात आली. गेल्या वर्षाशी तुलना करता ही वाढ 97.94 टक्के आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा 26 हजार 851 युनिट होता. असं असलं तरी दोन वर्षांपूर्वीच्या वाहन विक्रीच्या तुलनेत व्यावसायिक वाहनांचा खप 14.71 टक्क्यांनी कमी आहे. दोन वर्षांपूर्वी या श्रेणीमध्ये 62 हजार 319 वाहनांची नोंदणी झाली होती. ऑगस्टमध्ये थ्री-व्हीलर विभागात वाढ दिसून आली. गेल्या महिन्यात एकूण 30 हजार 410 वाहनांची नोंदणी झाली. ऑगस्ट 2020 मध्ये 16 हजार 923 वाहनं विकली गेली होती. यावर्षी 79.80 टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात दुचाकी आणि प्रवासी वाहन नोंदणीत वाढ झाली आहे. ही प्रवासी वाहन विभागातली गेल्या दोन वर्षांमधली विक्रमी वाढ आहे. ऑगस्ट 2021 मध्ये नऊ लाख 76 हजार 51 दुचाकींची नोंदणी करण्यात आली. गेल्या वर्षी याच काळात नऊ लाख 15 हजार 126 युनिटची विक्री झाली होती. म्हणजेच दुचाकीच्या विक्रीमध्ये 6.66 टक्के वाढ झाली. त्याचवेळी, प्रवासी वाहन विभागात दोन लाख 53 हजार 363 युनिटसची नोंदणी करण्यात आली. त्यात 38.71 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा एक लाख 82 हजार 651 युनिट्स होता. कोरोनापूर्व काळातल्या वाढीपेक्षाही प्रवासी वाहनांमधली वाढ मोठी आहे.
ऑगस्ट महिन्यात ट्रॅक्टरच्या 71 हजार 737 युनिट्सची नोंदणी झाली. गेल्या वर्षी हा आकडा 67 हजार 999 युनिट्स होता. म्हणजेच, त्यात 5.50 टक्क्यांची वाढ आहे. मात्र, आता ही वाढ मंदावत आहे. विशेष म्हणजे हे आकडे पितृपक्षाच्या कालावधीतले आहेत. हिंदू मान्यतेनुसार या काळात नवी खरेदी केली जात नाही, पण याच काळात गाड्यांची विक्री वाढल्याचेही दिसते. ‘किया सेल्टोस’ कंपनीने केवळ 35 दिवसांमध्ये 40 हजार गाड्यांची नोंदणी केली, ज्यांची किंमत प्रत्येकी 9 लाखांच्याही पुढे आहे. ‘लॅम्बॉर्गिनी’ या लक्झरी चारचाकी उत्पादक कंपनीने एका वर्षात विकलेल्या एसयुव्हींची संख्या 50 असून त्यांची प्रारंभिक किंमत 3 कोटी 10 लाख इतकी आहे. गेल्या दोन वर्षांपासून आलेल्या कोरोना विषाणूमुळे सर्वच क्षेत्रात जोरदार फटका बसला. मात्र असे असले तरी शासनाच्या शर्ती आणि अटी पाळून व्यवसाय सुरू झाला. साथीच्या रोगामुळे लोकांना ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’ ने प्रवास करणं असुरक्षित वाटत असल्याने नवीन वाहनांची खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढणार आहे.