ज्ञानदेव की दाऊद? हाच खरा प्रश्‍न!

जयंत माईणकर

ज्ञानदेव की दाऊद! एक नाव ज्ञानियाचा राजा म्हणून ओळखलं जातं तर दुसरं नाव मुंबईच्या गँगस्टरच! एखाद्या व्यक्तीच्या नामसाधरम्यामुळे ती व्यक्ती तशीच असावी असं मानणारा मी नाही. पण इथे प्रश्‍न केवळ नावाशी नसून त्याचा प्रश्‍न धर्माशी, सरकारी नोकरीतील राखीव जागेशी आहे आणि म्हणून ही दोन्ही नाव सध्या फार महत्त्वाची आणि चर्चित असलेली आहेत.
आर्यन खानला पकडण्यार्‍या आणि त्याआधी दहा महिने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात पकडणार्‍या नार्कोटिक कंट्रोेल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक आणि 2008 चे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस कॅडरचे समीर वानखेडे यांच्या दलित असण्यावर मलिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांमुळे. मलिकांच्या मते समीर वानखेडे हे मुस्लिम असूनही त्यांनी दलित जात वापरून इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मधील राखीव जागा मिळवली. नवाब मलिक यांच्या जावयाकडे सापडलेल्या हरबल तंबाखुला गांजा सांगून त्यांच्या मागे दहा महिने चौकशीचा ससेमिरा एनसीबीच्या समीर वानखेडे यांनीच लावला होता.
नवाब मलिक कदाचित आपल्या जावयाजवळील हरबल तंबाखुला गांजा समजणार्‍या वानखेडेंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायला निघाले की काय असे वाटणे साहजिकच आहे.
उपलब्ध माहितीनुसार समीर वानखेडेंचे मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरुड तुफा हे असून पैनगंगेच्या तिरावर वसलेलं हे गाव आहे. समीरचे वडील ज्ञानदेव कचरू वानखेडे कुटुंबियांसमेवत नोकरीनिमित्त जेथे राहायला गेले, तेथे मुस्लीम एरिया असल्याने लोकांमध्ये त्यांचं येणं-जाणं होतं, उठणं-बसणं असायचं. त्यावेळी, तेथील लोकांनी तुम्हाला दाऊद म्हटलं तर चालेल का असं म्हटलं होतं. तेव्हा दाऊद म्हणतात, इब्राहीम म्हणा, काहीही म्हणा… मला काही देणंघेणं नाही, असे ज्ञानदेव यांनी म्हटलं होतं, असा अजब दावा ज्ञानदेव यांच्या शिक्षक असलेल्या मोठ्या भावाने केला आहे.
समिर वानखडे यांच्या पहिल्या मुस्लिम बायकोचे सासरे डॉक्टर आहेत त्यांनी सांगितले. समीर यांचे कुटुंब मुस्लिम असल्यामुळेच आम्ही मुलगी दिली. समीर वानखेडे यांचा डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत त्यांचा निकाह झाला होता 2006 साली. या निकाहनाम्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. याविषयी ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समीरच्या आईने लग्नासाठी आग्रह धरला होता. मुस्लिम मुलीशी निकाह करायचा असेल तर दोघांचाही धर्म एकच असायला हवा. अन्यथा तो विवाह ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे समीरच्या आईने निकाहनाम्यावर त्याला सही करायला लावली. यामध्ये काहीही गैर नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले. म्हणजे एकूणच या प्रकरणात शंका घेण्यास या प्रकरणात जागा आहे.
समीर वानखेडे यांनी आपली धार्मिक ओळख लपवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांनी केला आहे. या आरोपाला समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याची कागदपत्रे जाहीर केली होती. मात्र, माझ्या पत्नीचे नातेवाईक किंवा अन्य कोणीतरी मला प्रेमाने दाऊद हाक मारत असावेत. मी ही शक्यता नाकारत नाही, असा अजब दावा ज्ञानदेव वानखेडे यांनी केला.
नियमानुसार हिंदू धर्मातील मागासवर्गीय जातींना मिळणार्‍या सवलती बौद्ध आणि शीख धर्मात लागू आहेत. मात्र या सवलती मुस्लिम आणि ख्रिश्‍चन धर्मात लागू नाहीत. मग याचा अर्थ समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव, जे स्वतः पोलीस अधिकारी होते यांनी आपल्या मुस्लिम पत्नीशी लग्न केल्यानंतर धर्मांतर करून दाऊद हे नाव घेतलं का हा प्रश्‍न आहे. जर तसं असेल तर समीर वानखेडे यांच्या णझडउ सिलेक्शन वर सुद्धा प्रश्‍नचिन्ह उपस्थित होतं. कारण णझडउ मध्ये त्यांनी आपलं नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असं लिहून अर्थात दलित समाजाला मिळणार्‍या सवलतींचा फायदा घेतला आहे.
गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक वानखेडेंविरोधात अनेक दावे करत आहेत. मलिकांच्या आरोपांना समीर यांच्या दुसर्‍या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही हिंदूच आहोत हे देखील तिने ठासून सांगितलं. पण मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.
वानखेडे एक सरकारी अधिकारी असल्याने, तेही पब्लिक आयमध्ये आहेत. त्यांची पत्नी, बहीण, वडील सगळे पत्रकार परिषद घेऊन उत्तरे देत आहेत. डॉक्युमेंटरी इव्हीडन्स वर का अवलंबून राहता येत नाही? सरकारी अधिकार्‍यांच्या नियुक्तीला काही नियमावली आहे. त्यात काही गडबड आहे असे दर्शविणारे पुरावे नवाब मलिक यांनी दिल्यामुळे या घटनेला नवा अँगल मिळत आहे.
खोट्या जातीच्या आधारावर आरक्षण घेऊन सरकारी नोकरी मिळवणे हा दखलपात्र गुन्हा आहे. राजकारण्यांनाही तो लागू होतो. त्यांची निवडणूक रद्द होऊ शकते. हाच प्रकार अमरावतीच्या अपक्ष आणि भाजपला समर्थन करणार्‍या खासदार नवनीत राणा आणि सोलापूरचे भाजपचेच खासदार जयसिद्धेश्‍वर स्वामी यांच्या बाबतीत घडला असून प्रकरणं न्यायप्रविष्ट आहे.
प्रश्‍न हा उद्भवतो की 2008 मध्ये त्यांनी यु.पी.एस.सी ची परीक्षा दिली असणार तेव्हा ते कोणत्या धर्मात होते? मग 2008 मध्ये मुस्लिम धर्म झुगारून, पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला का? असल्यास कधी?
हिंदू धर्म स्वीकारून जातीच्या दाखल्यावर त्यांनी आरक्षणात हि नोकरी मिळवली काय, हा मुख्य प्रश्‍न आहे. त्यांनी निकाह करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि मग नोकरी मिळवण्यासाठी पुन्हा हिंदू झाले?
क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार आणि पंच प्रभाकर सैल याने केलेले आरोप या प्रकरणाला नाट्यमय वळण देणारे आहेत. या प्रकरणात केंद्र आणि राज्य यांच्या संघर्षाचा अँगल स्पष्टपणे दिसतो. नार्कोटिक कंट्रोल ब्युरो किरण गोसावी नावाच्या 2018 साली चिटिंग मध्ये पकडलेल्या आणि 2019 ला पुणे पोलिसांनी वॉन्टेड घोषित केलेला पंच कसा चालू शकतो. म्हणजे समीर वानखेडेला या वॉन्टेड माणसाचा फोन नंबर माहिती होता आणि तरीसुद्धा त्याने मुंबई पोलिसांकडे याची माहिती का दिली नाही? पंचांना आरोपींची अर्थात आर्यन खानची कॉलर पकडून नेण्याचा अधिकार निश्‍चितच नसतो. पण या प्रकरणात अशा र्’ेीीं ेष र्ीीश्रशलेेज्ञ’अनेक घटनांची रेलचेल आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) क्रूझवर कारवाई करून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह इतरांना अटक केली. या कारवाईच्या संदर्भात तपास अधिकार्‍यांनी आठ ते दहा जणांना अटक केल्याचे मोघम सांगणे, काही जणांना संशयास्पदरित्या सोडून देणे वगैरे गोष्टींवर राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी यापूर्वी प्रकाश टाकला आहे. मग हे प्रकरण 25 कोटीच्या खंडणीचं आहे का? ड्रग्जच्या या प्रकरणाला मिळालेली अनेक नाट्यमय वळणे पाहता हे प्रकरण ‘अँटिलिया’ च्या मार्गाने जाऊ शकते, किंवा त्याहून अधिक चिखलफेक करणार बनू शकते. नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर महाराष्ट्राच्या गृहखात्याने आपणहोऊन दखल घेऊन प्रकरणाची चौकशी सुरू करायला हवी होती. पण शरद पवारांचे निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील याविषयी अजूनही काही बोलायला तयार नाहीत. आणि सरकारचे कर्ते शरद पवार सुद्धा शांत आहेत. मुख्यमंत्री तर नेहमीच शांत असतात. ज्या कायद्याच्या अंतर्गत आर्यनला अटक झाली आहे त्याच कायद्याच्या अंतर्गत स्व. प्रमोद महाजन या संस्कृती निष्ठ नेत्याचे चिरंजीव राहुल, अरमान कोहली, संजय दत्त पकडले होते. पण गुजरात मधील अदानी समुहाकडे असलेल्या मुंद्रा बंदरावर अफगाणिस्तान येथून आलेल्या 3000 किलो अंमली पदार्थांबाबत मात्र पुढे काही कळलं का? नाही! पंतप्रधान मोदींच्या जवळ असलेल्या या समुहाची कसून चौकशी करण्याची धमक का दाखवली जात नाही?
पण आर्यन खानच्या क्रूझ पार्टीची आणि अंमली पदार्थ बाळगल्याची चर्चा गेले तीन आठवडे दिवस रात्र चालू आहे…
भारती सिंग कडे 86 ग्राम अमली पदार्थ सापडूनही ती जेलमधून बाहेर आली. या कॉमेडीयन मध्यंतरी भाजपमध्ये सामील झाल्या होत्या. म्हणजे भाजपमध्ये गेल्या गेल्या ड्रग्जचा डाग धुतला गेला असं म्हणायचं का?

Exit mobile version