प्रा. नंदकुमार गोरेे
जगभरात वायू प्रदूषणाच्या समस्येनं भीषण रूप धारण केलं आहे. जगातल्या 91 टक्के लोकसंख्येला आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असलेल्या हवेत श्वास घेण्यास भाग पाडलं जातं. नवी दिल्ली, एनसीआरसह अन्य शहरांच्या वायू प्रदूषणाची दर वर्षी केवळ चर्चा होते. सर्वोच्च न्यायालयाने खडसावूनही काहीच निष्पन्न झालेलं नाही. आता तर मुंबई, पुण्यासह अन्य काही शहरांमध्येही वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहोचलं आहे. नागरिकांना मोकळा श्वास घेणंही अवघड झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं वायू प्रदूषणाबाबत धोक्याची घंटा वाजवली आहे. संस्थेने वायू प्रदूषण हा आपल्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा पर्यावरणीय धोका असल्याचं म्हटलं आहे. वायू प्रदूषणाबाबत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा धक्कादायक अहवाल जाहीर झाला आहे. भारतच नाही तर जगातल्या बहुतांश विकसित आणि विकसनशील देशांना वायू प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हवेच्या गुणवत्तेबाबत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वं फार पूर्वी जारी केली होती, परंतु जागतिक स्तरावर त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी अद्याप कोणतीही कायदेशीर चौकट नाही. वायू प्रदूषण रोखण्यासाठी 34 टक्के देशांमध्ये आवश्यक कायदा नाही. केवळ 33 टक्के देशांनी हवेच्या गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करण्याच्या बंधनांची अंमलबजावणी केली आहे. केवळ 49 टक्के देशांनी वायू प्रदूषणाचा धोका ओळखला आहे. एवढंच नाही, तर वायू प्रदूषण रोखण्यासाठी कायदे करणारे देशही जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या मानकांशी जुळत नाहीत.
युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम (यूएनईपी)ने हवेच्या गुणवत्तेचे कायदे आणि नियमांबाबत नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या नवीन अहवालात ही माहिती समोर आली आहे. यूएनईपी अहवाल जगातल्या 194 देशांमध्ये आणि युरोपीय संघातल्या हवेच्या गुणवत्तेचे नियम आणि कायदे तपासतो. या अहवालात वायू प्रदूषणाबाबत जगातले देश किती गंभीर आणि जागरुक आहेत, याचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. या अहवालानुसार, बहुतेक आफ्रिकन देशांमध्ये या मानकांचा अभाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या देशांनी जागतिक स्तरावर हवेच्या गुणवत्तेसाठी जारी केलेल्या मानकांचा अवलंब केला, तेदेखील जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांशी जुळत नाहीत. तिथे देशांनी आपापल्या आधारावर ते निश्चित केले आहेत. उदाहरणार्थ, हवेतल्या पीएम 2 ते 2.5 च्या गुणवत्तेसाठी जागतिक आरोग्य संघटनेनं अधिकृत केलेलं मानक 10 मायक्रोग्राम प्रति घनमीटर आहे. त्याच वेळी, भारत सरकारने पीएम 2.5 साठी 40 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरचं मानक निश्चित केलं आहे. वायू प्रदूषण ही कोणत्याही एका देशाची नव्हे तर संपूर्ण मानवजातीची समस्या आहे. जगातल्या केवळ 31 टक्के देशांमध्ये सीमेपलीकडील वायू प्रदूषणाला सामोरं जाण्यासाठी कायदेशीर यंत्रणा आहे. भारताकडे यासाठी कोणताही ठोस कायदा नाही.
वायू प्रदूषणामुळे दर वर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू होतो. ते थांबवण्यासाठी आताच गांभीर्यानं प्रयत्न केले नाहीत तर 2050 पर्यंत हा आकडा एक कोटींहून अधिक होईल. सरकारांना इच्छाशक्ती दाखवून या समस्येला सामोरं जावं लागेल. शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या अहवालात दिसून आलं आहे की याचा गांभीर्यानं विचार केला नाही तर प्रत्येक भारतीयाचं आयुष्य सहा वर्षांनी कमी होईल. हवेतल्या प्रदूषकांमुळे आजूबाजूला धुकं पसरलं आहे. हवेतलं हे प्रदूषण हृदयरोगाला निमंत्रण देणारं आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशननं नुकत्याच सादर केलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. या संशोधनात हवेतली पीएम 2.5 ची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, असं म्हटलं आहे. या संशोधनात आढळून आलं की मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे अमेरिकेत लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे हवेतली पीएम 2.5 ची पातळी कमी झाली. त्यामुळे तिथल्या हृदयविकाराच्या रुग्णांची संख्याही कमी झाली. भारतातही असाच अनुभव आला. संशोधकांना आढळून आलं की पेट्रोल आणि डिझेल वाहनांमधून निघणारा धूर, कारखान्यांमधून निघणारा धूर आणि पॉवर प्लांट्समध्ये जीवाश्म इंधन जाळणं यामुळे हवेतली पीएम 2.5 पातळी वाढवण्यात सर्वात जास्त भूमिका बजावली. या धुरात असलेले अत्यंत लहान कण श्वासाद्वारे रक्तात पोहोचतात आणि रक्ताद्वारे लोकांच्या फुफ्फुसात आणि हृदयापर्यंत पोहोचतात. त्यामुळे हृदयाकडे जाणार्या धमन्या आकुंचन पावतात. हे प्रदूषण कण हृदयविकाराचा धोका वाढवतात.
हवेतली पीएम 2.5 ची पातळी कमी झाल्यावर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते हे यावरून स्पष्ट होतं. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, वाढत्या वायू प्रदूषणामुळे वृद्ध लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो. एखादी व्यक्ती थोड्या काळासाठी प्राणघातक वायू प्रदूषणाच्या संपर्कात आली, तर त्याला हृदयविकाराचा धोका वाढतो. 2020 मध्ये एका संशोधनात असं आढळून आलं की हवेतल्या सूक्ष्म कणांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमधला पार्किन्सनचा धोका वाढतो. वायू प्रदूषणामुळे दीर्घकाळापर्यंत रक्तवाहिन्यांमधलं रक्त गोठणं, रक्तदाब, मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. वॉशिंग्टन विद्यापीठाचे फिजिशियन आणि एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. जोएल डी. कॉफमन यांनी 2016 मध्ये स्पष्ट केलं की महानगरांमध्ये राहणार्या लोकांच्या धमन्या पीएम 2.5 आणि हवेत असलेल्या नायट्रोजन ऑक्साईडमुळे आकुंचन पावतात. भारत आणि चीनमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये वायू प्रदूषण हे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि श्वसन रोग यासारख्या रोगांचं एक प्रमुख कारण आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं होणार्या मृत्यूंच्या बाबतीत भारत जगात दुसर्या क्रमांकावर आहे. जगातल्या हृदयविकाराच्या नवीन प्रकरणांपैकी 46.5 टक्के एकट्या भारत आणि चीनमध्ये आहेत. युरोपीयन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित एका ताज्या अभ्यासानुसार, इस्केमिक (आयएचडी) हृदयविकाराच्या प्रकारातल्या जगभरातल्या रुग्णांपैकी 25 टक्के एकट्या भारतात आहेत. 2019 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जगातल्या मृत्यूच्या दहा कारणांचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये हृदयविकार हे मुख्य कारण होतं. दीर्घकाळ खराब हवेमध्ये श्वास घेणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्याच्या दीर्घकालीन परिणामांमुळे फुफ्फुसाचा कर्करोगदेखील होऊ शकतो. त्याच वेळी, मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो. गर्भातले जन्मजात दोष आणि अपंगत्वाची समस्याही वाढू शकते. त्यामुळे प्रदूषण कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रभावी पावलं उचलली न गेल्यास तरुणांचं भविष्य अंधकारमय राहील. प्रदूषणामुळे मुलांमध्ये अॅलर्जी, खोकला, सर्दी आणि श्वसनाचे आजार वाढले आहेत. त्यामुळे मुलांची चिडचिड होऊ लागली आहे. खोकला, सर्दी आणि नाक बंद झाल्यामुळे नवजात बालकांना आहार देण्यात अडचणी येतात. यामुळे बाळांना ‘नेब्युलायझेशन’ देण्याची गरज भासते.
दीर्घ काळ प्रदूषित वातावरणात राहिल्याने फुफ्फुसाच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावरही परिणाम होतो. प्रदूषणामुळे गर्भवती महिलांमध्ये अकाली प्रसूतीचा धोका निर्माण होऊ शकतो, हे ही अनेक अभ्यासांमधून सिद्ध झालं आहे. तसंच जन्माप्रसंगी बाळांचं वजन कमी असू शकतं. अलिकडच्या काळात प्रदूषणाने श्वसनाचे रुग्ण सुमारे 40 टक्क्यांनी वाढले आहेत. दम्याच्या अनेक जुनाट रुग्णांना दाखल करावं लागतं. आधी श्वसनाचा कोणताही आजार नसलेल्यांना प्रदूषणामुळे दमा आणि सीओपीडी (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) होऊ शकतो, असं अभ्यासातून समोर आलं आहे. प्रदूषणामुळे शरीरातल्या चयापचय प्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढू शकते. प्रदूषणादरम्यान, वातावरणातले सूक्ष्म कण श्वासाद्वारे फुफ्फुस आणि रक्तापर्यंत पोहोचून शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम करतात. यामुळे फुफ्फुसाचे गंभीर आजार तर होतीलच पण हृदय आणि मेंदूचे गंभीर आजारही वाढू शकतात.