रिफ्लेक्टर पट्ट्यांअभावी महामार्गावरील प्रवास धोक्याचा

। सुधागड -पाली । वार्ताहर ।
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग रुंदीकरणाचे बहुतांश काम मार्गी लागले आहे. मात्र नवीन डांबरी व सिमेंटच्या रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच रिफ्लेक्टर नसल्याने हा रस्ता धोक्याचा झाला आहे.

पावसामुळे रस्ता ओला झाल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे नसल्याने या मार्गावर काही छोटे मोठे अपघातसुद्धा झाले आहेत. तसेच मार्ग रुंदीकरण दरम्यान काही ठिकाणी रस्त्यावर असुरक्षित व धोकादायक खोदकाम केले आहे. काही कंपन्यांचे येणारे मोठे टँकर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा देखील येतो. या समस्यांमुळे देखील येथून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे.

महत्वाचा मार्ग
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवासी, वाहने व मालवाहू वाहने याच मार्गावरून जातात. अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथे देखील शेकडो भाविक या मार्गाने येतात. परिणामी, रिफ्लेक्टर व पांढर्‍या पट्ट्यांअभावी रात्रीच्यावेळी वाहने चालवितांना वाहनचालकांची गैरसोय होत आहे.

हा राज्य महामार्ग अतिशय महत्वाचा आहे. नवीन डांबरी व सिमेंटच्या रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच वळणावर रिफ्लेक्टर नाहीत त्यामुळे पावसाळ्यात रस्ता ओला झाल्याने वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नाही. परिणामी, अपघाताची शक्यता वाढली आहे. याशिवाय वाहतूक देखील मंदावते. त्यामुळे या राज्यमार्गावर रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे बसविण्यात यावेत.

– संजोग शेठ, शेकाप शहर सहचिटणीस, पाली

या मार्गावरील कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

– सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी
Exit mobile version