आदिवासी ठाकूर बांधवांचा मोजणीला विरोध
| कोर्लई | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील डोंगराळ दुर्गम भागातील सागरगड माची येथे गेली कित्येक वर्षांची आदिवासी व ठाकूर समाजाची लोकवस्ती असून, त्यांच्याकडे अधिवासाचे सर्व पुरावे आहेत. असे असताना या भागामध्ये ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी सुरु असून, तिला आदिवासी ठाकूर समाजाचा विरोध आहे. येथील दळी जमिनींवर अतिक्रमण करुन त्या धनदांग्यांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप येथील आदिवासी ठाकूर बांधवांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देत होणारी मोजणी तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
आपल्यावरील अन्याय दूर व्हावा यासाठी आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष जानू शिद यांनी अॅड. डॉ. के.डी.पाटील, डॉ. संदीप वारगे, अॅड. विक्रांत पाटील आदी सहकार्यांसमवेत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. रायगड जिल्हा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी ते स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे की, सागरगड माची या डोंगराळ भागामध्ये आदिवासी व ठाकूर समाज पिढ्यान्ढ्यिांपासून राहात आहे. या भागामध्ये एक ठाकूरवाडी, दोन कातकरी (आदिवासी) वाड्या आहेत. त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षणासाठी रायगड जिल्हा परिषदेची शाळादेखील याठिकाणी आहे. आदिवासी समाज व ठाकूर समाज हा एक आदिम समाज असून, मोलमजुरी व काबाडकष्ट करुन हा समाज या भागामध्ये राहात आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे व उपजीविकेचे साधनही याच भागावर अवलंबून आहे. याठिकाणच्या दळी भागामध्ये आदिवासी लोक नाचणी, वरी, भात, भाजीपाला याचे उत्पादन घेऊन उदरनिर्वाह करीत आहेत. याठिकाणी सत्तर गायींचा गोठा असून, पूर्वीपासून वास्तव्य आहे.
असे असताना काही धनदांडग्यांच्या या भागातील शिरकावामुळे व आर्थिक हितसंबंधांमुळे आदिवासी व ठाकूर समाजाच्या राहत्या घरांची तोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे त्यांना दिलेल्या दळी भागामध्ये अतिक्रमण करून हे धनदांडगे लोक व त्यांचे हस्तक आदिवासी, ठाकूर समाजाला हुसकावून लावण्याचे काम करीत आहेत. मात्र सदर दळी भागांवर झालेले अतिक्रमण व नासधुसीमुळे भविष्यात या समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे. गेली कित्येक वर्षांची आदिवासी व ठाकूर समाजाची लोकवस्ती या ठिकाणी राहत असून त्यांच्याकडे अधिवासाचे सर्व पुरावे आहेत.असे असतान सदर भागामध्ये ड्रोन द्वारे जमिनीची मोजणी सुरु आहे. सदर मोजणीला देखील आदिवासी, ठाकूर समाजाचा ठाम विरोध असताना त्या विरोधाला व विनंतीला न जुमानता ही मोजणी सुरुच आहे.सदर मोजणी तात्काळ रद्द करणे गरजेचे व आवश्यक आहे.
मानवाधिकाराचा विचार करुन आदिवासी व ठाकूर समाजाच्या विरुध्द सुरु असलेल्या अनुचित मानवी प्रथेचा कायमचा बिमोड करुन त्या समाजाला न्याय मिळवून द्यावा.असे आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असून सदर निवेदनाच्या प्रती जिल्हा अप्पर अधिक्षक अभिजित शिवथरे, जिल्हा भूमी अभिलेख, प्रांताधिकारी, तहसीलदार,पोयनाड पोलिस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जानू शिद, कायदेशीर सल्लागार अॅड.डॉ. के.डी.पाटील, डॉ. संदीप वारगे, अॅड. विक्रांत पाटील, गणेश कातकरी, सल्लागार संतोष चिंचकर, अॅड. नरेश पाटील, दिलीप कातकरी, श्रीमहंता सिद्धेश्वर रामस्वरुपदास त्यागी, संस्थेचे कोषाध्यक्ष जगदीश हिलम यांसह आदिवासी बांधव व महिला संख्येने उपस्थित होत्या.