जावेळे गाव ‘बिबट्याच्या ताब्यात’!

गोठ्यात घुसून वासराचा बळी; प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड
वारंवार तक्रारी करूनही वनविभाग निष्क्रिय

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे गावात सध्या कायदा आणि प्रशासन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. बिबट्याने गावात अक्षरशः दहशत माजवली असून थैमान घातले आहे. बिबट्या आता निर्भयपणे घरांच्या अगदी जवळ येत थेट गोठ्यांमध्ये घुसून हल्ले करत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही वनविभागाचे भ्रष्ट अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे, ज्यामुळे नागरिकांचा रोष आता टोकाला पोहोचला आहे.

प्रशांत (पिंट्या) मळेकर यांच्या घराशेजारील गोठ्यात काल रात्री 3 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शिरकाव केला. जनावरांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला. घरातील सदस्य बॅटरी घेऊन धावत पोहोचले असता, समोर वासराचा अर्धवट फाडलेला देह आणि अंधारात पसार होणारा बिबट्या दिसून आला. ही घटना केवळ एक अपघात नसून, प्रशासनाच्या अपयशाची जिवंत साक्ष असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तक्रारींचा पाऊस, मात्र कारवाई शून्य
गेल्या अनेक दिवसांपासून जावेळे गावात व आजू बाजूच्या परिसरात बिबट्याचे हल्ले सुरू आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी वनविभागाकडे लेखी तक्रारी, निवेदने, फोन करून परिस्थितीची गंभीरता सांगितली. मात्र, प्रशासनाने प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांची धूळफेक केली, असा आरोप करण्यात येत आहे.
यापूर्वी विजय महादेव रांगले यांच्या दोन गुरांचा बळी गेला होता. त्यांनी अधिकृत निवेदन देऊनही वनविभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. “आम्ही ओरडत आहोत, पण प्रशासन बहिरे झाले आहे का?” असा संतप्त सवाल आता गावकरी विचारत आहेत.
नुकसानाची मालिका सुरूच
* 10 हून अधिक दुभती जनावरे व वासरे ठार
* 5 पेक्षा अधिक पाळीव कुत्र्यांवर हल्ले
* लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान
* पशुपालकांचे कंबरडे मोडले
भीतीचे सावट; गाव ‘लॉक’ अवस्थेत
जावेळे गावात सध्या भीतीचे साम्राज्य पसरले आहे. लोक दिवसाही घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. शेतात जाणे धोकादायक झाले आहे. रात्रीच्या वेळी तर संपूर्ण गाव अक्षरशः बंदिस्त होते. महिला, लहान मुले आणि वयोवृद्ध यांच्यावर मानसिक ताण वाढत आहे.
‘निष्क्रियता की संगनमत?’- वनविभागावर आरोप
घटनास्थळी उशिरा पोहोचणे किंवा अजिबात न येणे, पंचनाम्यात दिरंगाई, भरपाई प्रक्रियेत टाळाटाळ, कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना नाही, वारंवार तक्रारींकडे दुर्लक्ष असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर उपस्थित केले आहेत. 'हा फक्त निष्क्रियपणा नाही, तर जनतेच्या जीवाशी खेळ आहे,' असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
ग्रामस्थ आक्रमक
बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, 24 तास गस्त वाढवावी, नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्यावी तसेच, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. आता सहनशक्ती संपली असून प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.
मानवी जीविताला धोका – जबाबदार कोण?
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे एखादी मानवी जीवितहानी झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी वनविभाग आणि प्रशासनावर असेल.
‘जागे व्हा!’ अन्यथा परिणाम भोगा
जावेळे गावातील परिस्थिती आता स्फोटक बनली आहे. बिबट्याचा वाढता कहर आणि प्रशासनाची बेजबाबदार भूमिका यामुळे गावकरी अक्षरशः असुरक्षित झाले आहेत.
Exit mobile version