नागशेत, कोशिंबळेत तीन पाळीव जनावरांचा बळी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यात नागशेत व कोशिंबळे परिसरात बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले करून दहशत निर्माण केली आहे. दाट जंगलाला लागून असलेल्या या गावांमध्ये गेल्या काही दिवसांत बिबट्याने तीन जनावरांची हत्या केली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरू असून शेतकरी, ग्रामस्थ तसेच शाळकरी मुलांचेही जीव या हल्ल्यांत गेले आहेत. दरम्यान, कोकणातही बिबट्याचे संचार वाढत आहे. सुधागड तालुक्यात सुद्धा अशाप्रकारे बिबटयांची दहशत वाढत असल्याने परिसरात घाबराट पसरली आहे.
बिबट्याच्या जनावरांवरील हल्ल्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर लगेचच सुधागड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे, वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम, अनुभवी वनपाल उत्तम किसनराव शिंदे, वनरक्षक समाधान कुटे, पाच्छापूर वनरक्षक सायली महाडिक, पशुधन अधिकारी म्हसकर आणि नांदगाव विभागीय पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तातडीने भरून निघावे म्हणून परिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे यांनी संबंधित कागदपत्रांसह भरपाईचा प्रस्ताव अलिबाग वनविभागाकडे पाठविला आहे. संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार लवकरच भरपाई मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.







