मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्याना वेळ देऊया- पृथ्वीराज चव्हाण

| मुंबई | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांच्या पायावर हात लावून मराठा आरक्षणासाठी शपथ घेतली आहे. त्यांना वेळ देऊया. मला आशा आहे ते निर्णय घेतील, असे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वात आधी मी मराठा आरक्षणाचा विषय हाती घेतला होता. आमच्या सरकारने मराठा आरक्षण दिलं होतं. आम्ही कायदेशीर सल्ला घेऊनच मराठा आरक्षण दिलं होतं. जातनिहाय जनगणना करायला हवी ही काँग्रेसची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.

कामकाज सल्लागार समितीने अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 7 तारखेपासून अधिवेशन सुरु होईल. जनतेचे प्रश्न चर्चिले जातील. नागपूर परिसरात पाऊस झाला. हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्यावर उपाययोजना कराव्या अशी विनंती त्यांनी केली.

जातीय जनगणना करा ही आमची ही मागणी आहे. फक्त जातीय जणगणना नाही. ही इकॉनॉमिक सेन्सेसवर असेल म्हणजे आर्थिक आणि सामाजिक गोष्टींवर निर्भर असेल. आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण टिकवलं असतं हेच माझं विधान होतं, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

सुनील तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. तटकरेंचा बालीशपणा आहे. मला कुठलीही सुपारी वगैरे नव्हती. तेवढीच कामं नसतात, असे चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादीने सरकार पाडलं नसते तर मराठा आरक्षण टिकवलं असते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यावर सुनील तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादीला संपवण्यासाठी दिल्लीतून सुपारी घेऊन आले होते, अशी टीका केली होती.

Exit mobile version