नवी मुंबईत धुरक्यांमुळे जनजीवन विस्कळीत

वाढत्या प्रदूषणामुळे रुग्ण संख्येत वाढ

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईला लागूनच असलेल्या नवी मुंबईतही दररोज धुरके आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र कायम असून या वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, पडसे तसेच खोकल्याने हैराण असलेल्या रहिवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. नवी मुंबई महापालिका तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत वाशी आणि कोपरखैरणेच्या वेशीवर असलेल्या कोपरी भागातील प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. वाशी, कोपरखैरणे तसेच पाम बीच मार्गावरील मोराज परिसरात राहणारे रहिवासी सायंकाळपासून मुंबईकडून वाऱ्याने वाहत येणाऱ्या उग्र दर्पाने हैराण झाले असून याविषयी स्थानिक नियोजन प्राधिकरण म्हणून नवी मुंबई महापालिकेकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

वाढत्या प्रदूषणामुळे हैराण झालेल्या कोपरी येथील नागरिकांनी नवी मुंबई विकास अधिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून मागील महिनाभरापासून कोपरी सेक्टर 26 येथील चिंतामणी चौकात एक तासाचे धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या आसपासच्या भागातील रहिवासी वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महापालिकेचे अधिकारी अजूनही या नागरिकांची तक्रारींची दखल घेण्यासाठी फिरकलेले नाहीत.

एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांना खेटून असलेला हा परिसर नवी मुंबईतील सर्वाधिक प्रदूषित मानला जातो. याच भागातून खाडीच्या दिशेने सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या नाल्यातून सकाळ-सायंकाळी उग्र दर्प सुटत असून त्याकडेही यंत्रणांचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. या नाल्यामुळे खाडीत प्रदूषित पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी असून सकाळी वाशीतील मिनी सीशोअर तसेच कोपरखैरणे भागात खाडी किनारी फेरफटका मारावयास येणाऱ्या रहिवाशांचा कोंडमारा होऊ लागला आहे.


प्रदूषण वाढतेच
नवी मुंबई महापालिका तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आलेल्या हवेतील गुणवत्तेच्या मोजणीत कोपरी येथील हवेचा निर्देशांक 250 ते 290 च्या घरात असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञांच्या मते हे प्रमाण धोकादायक आहे. महापे, सानपाडा येथील हवेचा निर्देशांकही 200 पेक्षा अधिक असून हवेच्या गुणवत्तेची पातळी सातत्याने ढासळत आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते संदीप ढोबळ यांनी दिली. सानपाडा, नेरुळ, महापे या केंद्रांवरील हवेचा निर्दशांक 170 ते 220 पर्यंत असला तरी या भागातही सकाळच्या धुरक्यामुळे सतत बदलत्या वातावरणाचा अनुभव रहिवासी घेत आहेत.
Exit mobile version