चोवीस तासांत 38 जणांचा मृत्यू
। लखनौ/प्रतापगड । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशात बुधवारच्या चोवीस तासांत वीज पडून झालेल्या विविध दुर्घटनेत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. यात प्रतापगड येथे सर्वाधिक 11, सुलतानपूर येथे सात, चंदौली येथे सहा, मैनपुरी येथे पाच, प्रयागराज येथे चार, औररिया, हाथरस, वाराणसी आणि सिद्धार्थनगर येथे प्रत्येकी एका जणांचा मृत्यू झाला. तसेच दहा ते बारा जण जखमी झाले.
उत्तर प्रदेशात बुधवारी वीज कोसळून झालेल्या घटनांत किमान 38 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या उत्तर प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती असून जनजीवन ठप्प झाले आहे. प्रतापगड जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडल्याने अकरा जणांचा मृत्यू झाला. तसेच चंदोली येथे वीज कोसळल्याने अनेक जण जखमी देखील झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल सायंकाळी चार ते सहा या काळात प्रचंड पाऊस झाला आणि वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. यादरम्यान दोन चुलत भाऊ शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोघांचाही मृत्यू झाला.
सुलतानपूर येथील सात मृतांत तीन मुलांचा समावेश आहे. वीज कोसळल्याची घटना घडली. तेव्हा काहीजण धानाची लागवड करत होते. तर काहीजण आंबे तोडणीचे काम करत होते. मात्र वीज पडल्याने एकच कल्लोळ उडाला. तसेच जिल्ह्यात एक महिला झाडाखाली उभी असता तिच्या अंगावर वीज पडली. तिचा जागेवरच मृत्यू झाला. औररिया येथे पावसामुळे आंब्याच्या झाडाखाली थांबलेल्या एका चौदा वर्षाच्या मुलाचा वीजेमुळे मृत्यू झाला. देवरिया येथे शेतात जाणार्या पाच वर्षाच्या मुलाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. वाराणसीत दोन भावांवर वीज कोसळली. यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्यावर उपचार सुरू आहेत. भारतीय हवामान खात्याने येत्या पाच दिवसांत उत्तर प्रदेश आणि अन्य लगतच्या राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.