दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; ग्रंथप्रेमींना मिळणार वैचारिक मेजवाणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
ग्रंथसंस्कृतीचा वारसा जपणे आणि वाचन चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अलिबाग यांच्यावतीने ग्रंथोत्सव 2026चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे दि.12 व 13 मार्च रोजी हा ज्ञानोत्सव रंगणार आहे.
ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.12) सकाळी साडेनऊ वाजता भव्य ग्रंथदिंडी निघणार आहे. महाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, उपविभागीय अधिकारी पोपटराव ओमासे आणि उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांच्या हस्ते या दिंडीचे उद्घाटन होईल. यावेळी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक शंकरराव काळे, शोभाताई सावंत, सीमाताई मपारा, गंगाधर साळवी आणि प्रकाश जमदाडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. सकाळी 11 वाजता मुख्य उद्घाटन समारंभ संपन्न होईल. या सोहळ्याला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी खा. सुनील तटकरे, खा. श्रीरंग बारणे, खा. धैर्यशील पाटील आणि आ. रवींद्र पाटील, आ. महेंद्र थोरवे, आ. महेश बालदी, आ. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे व आ. विक्रांत पाटील उपस्थित राहतील. प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचीही उपस्थिती असेल.
या ग्रंथोत्सवात ग्रंथप्रेमींना दोन्ही दिवस वैचारिक मेजवानी मिळणार आहे. गुरुवारी ज्येष्ठ साहित्यिक ॲड. विलास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सत्राचे आयोजन करण्यात आले असून, प्रभाकर भुस्कुटे आणि प्रा.डॉ. रवींद्र सोमोशी हे प्रमुख अतिथी असतील. दुपारी उत्कृष्ट वाचकांचा सन्मान आणि त्यानंतर डॉ. विष्णू सुरासे यांचा तणावमुक्त आनंदी जीवनाचा मूलमंत्र हा विनोदी साहित्य वाचनाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.13) सकाळी 9.00 वाजता जि.प. शाळा आसणपोईच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य होईल. त्यानंतर वाचन संस्कृतीचे पाईक-सार्वजनिक ग्रंथालये या विषयावर चांगदेव काळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद रंगेल, ज्यामध्ये शैलाताई पाटील, रामदास गायकवाड, प्रा. भाऊसाहेब नन्नावरे आणि श्रीमती सीमा मपारा सहभागी होतील. दुपारी प्रा. यशवंत गोसावी हे कुशल प्रशासक- लोकमाता अहिल्याबाई होळकर या विषयावर व्याख्यान देतील. दुपारी चारुदत्त चिखले रचित ही माती माझ्या यात्रेची विठाई या कवितासंग्रहाचे प्रकाशन होईल. त्यानंतर प्रा. एल.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काव्यवाचन सोहळा संपन्न होईल. काव्यवाचन सत्रात रमेश धनावडे, नंदू तळकर, जितेंद्र ओक, हेमंत बारटक्के, डॉ. सुभाष कटकदौंड, शरद कोरडे, पा.शि. पाटील, प्रतीक्षा नगरकर, प्रिया शहा, कैलास पिंगळे, दीप्ती कुलकर्णी, वैभव घनावडे आणि शीतल गांधी हे कवी सहभागी होणार आहेत.
त्याचबरोबर या दोन दिवसांत ग्रंथांचे भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमस्थळी होणार असून, येथे सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. या कार्यक्रमाचे नियोजन सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी केले असून, या ग्रंथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रायगड ग्रंथोत्सव समितीने केले आहे.






