अमरावतीमधील सभेत राहुल गांधींचे आश्वासन
| अमरावती | वृत्तसंस्था |
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात तुमचं कर्ज माफ केले नाही. पण आम्ही सत्तेत आल्यावर तुमचं कर्ज लगेच माफ करु. याशिवाय, देशात एका कृषी आयोगाची स्थापना केली जाईल. जेव्हा कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल तेव्हा हा आयोग सरकारला कर्जमाफीची शिफारस करेल. त्यामुळे केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा कर्जमाफी होईल. या देशात संपत्तीची कमी नाही. तुम्ही देशातील अब्जाधीश उद्योगपतींकडे बघा, त्यांचं घर, गाड्या बघा. ते पाहून आपल्याला लक्षात येईल की, देशात संपत्तीची बिलकूल कमी नाही. जर अब्जाधीश उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं, तर गरिबांचं कर्जही माफ झालं पाहिजे. केंद्र सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करतंय, मग शेतकऱ्यांचं कर्जही माफ झालेच पाहिजे. अन्यथा देशात कोणालाही कर्जमाफी करता कामा नये, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
महिलांसाठीमोठी घोषणा
राहुल गांधी यांनी अमरावतीमधील सभेत महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. आम्ही प्रत्येक कुटुंबाची यादी तयार करणार आहोत. प्रत्येक कुटुंबातून एका महिलेची निवड केली जाईल. या महिलेच्या बँक खात्यात काँग्रेस पक्षाचं सरकार, इंडिया आघाडीचं सरकार प्रत्येक महिन्याला 8 हजार 500 रुपये या हिशेबाने वर्षाला प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात एक लाख रुपये जमा करेल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. देशातील कोट्यवधी महिलांना महालक्ष्मी योजनेचा लाभ मिळेल, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.