धरण हटवा, शेतकरी वाचवा मोहीम; तहसील कार्यालयावर मूक मोर्चा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर बांधण्यात येणाऱ्या पोशीर धरणाला स्थानिकांनी विरोध केला आहे. धरण होणार असलेल्या भागातील शेतकरी यांनी हे धरण होऊ नये यासाठी 17 मार्च रोजी मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. बोरगाव शेतकरी मंडळ धरण हटाव समितीच्या वतीने हे आंदोलन केले जाणार असून, कर्जत तहसील कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे.
कर्जत तालुक्यातील प्रस्तावित पोशीर प्रकल्पाचा वाद आता पेटला आहे. धरणाला शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता हा प्रश्न चिघळण्याची चिन्हे आता दिसत आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी कायमचा भूमिहीन होणार असल्याने स्थानिक शेतकरी यांनी शेतकरी मंडळ बोरगांव परिसर धरण हटाव समितीच्या नेतृत्वाखाली विरोध सुरू केला आहे. या भागातील शेतकरी आक्रमक झाले असून, धरणाला कडाडून विरोध करण्यासाठी कर्जत प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोशीर धरण प्रकल्पाच्या हालचालींना प्रशासकीय पातळीवर वेग आला असला, तरी स्थानिक पातळीवर मात्र विरोधाची धार तीव्र झाली आहे. या प्रकल्पामुळे बोरगांव, कुरुंग, उंबरखांड, भवानीपाडा, बोन्डेशेत, पेंढरी , भोपळे वाडी हे गावे बाधित होणार असून चई, चेवणे, चाफेवाडी, बलीवरे आणि खांडस या गावांचा भाग पाण्याने भरणार आहे.
या भागातील शेतकरी अनेक पिढ्या शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी देशोधडीला लागेल, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे. या गावांमधील सुपीक जमीन धरणाखाली जाणार असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनात गावा-गावातील नवतरुण वर्ग मोठ्या संख्येने सामील होणार आहेत. येथील तरुणांनी गावोगावी जाऊन प्रकल्पाचे दुष्परिणाम सांगत जनजागृती सुरू केली आहे. धरण हटवा, शेतकरी वाचवा अशी मोहीम सध्या जोरदारपणे राबवली जात असून गावोगावी बैठका घेतल्या जात आहे. या प्रकल्पाचा लढा उभारण्यासाठी स्थानिक शेतकरी मंडळ बोरगांव परिसर पोशीर धरण हटाव समिती स्थापन करण्यात आली असून, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने कर्जतचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, शेतकरी संघटना व सर्व राजकीय नेत्यांनाही या आंदोलनाची माहिती देऊन पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
17 मार्चला होणाऱ्या या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे शेतकऱ्यांच्या वतीने पोशीर धरण हटाव समितीचे अध्यक्ष तानाजी चौधरी व स्थानिक शेतकरी मंडळ बोरगांव परिसर यांचेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
