जिल्ह्यात एसटीला दोन दिवसात सात लाख रुपयांचा फटका
| अलिबाग | प्रतिनिधी |
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी जाळपोळ सुरु केली आहे. त्यामुळे रायगड विभागातून लांब पल्ल्याच्या एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. एकूण 50 फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून दोन दिवसात एसटीला सुमारे सात लाख रुपयांचा तोटा झाला आहे.
सरकारविरोधात आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. काही ठिकाणी एसटीची जाळपोळ झाली आहे. त्यामुळे प्रवासी व एसटीच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसटी महामंडळ रायगड विभागाने सोलापूर, कोल्हापूर, बीड, शिर्डी, अक्कलकोट, जामखेड, जळगाव आदी मार्गावरील एसटीच्या 50 फेऱ्या गेल्या दोन दिवसांपासून रद्द केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली असताना एसटीला आर्थिक फटका बसल्याची माहिती एसटी महामंडळ रायगड विभगाने दिली.
लांब पल्ल्याच्या 50 एसटी बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. प्रवाशांची या कालावधीत गैरसोय झाली आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे.
दिपक घोडे – वाहतूक नियंत्रक, रायगड विभाग