वनखात्याचे दुर्लक्ष
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यात वणवे लावण्याच्या प्रमाणात आता प्रचंड वाढ झाली असून, अक्षरशः तालुक्यातील डोंगरच्या डोंगर आगीच्या भस्मस्थानी होरपळताना दिसत आहेत. त्यामुळे प्रचंड वनसंपदेची हानी होत असल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली असून, याकडे वनखात्याचे दुर्लक्ष व डोळेझाक होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
वणव्यामुळे उरण चाणजे, चिरनेर या ठिकाणचे डोंगर सायंकाळच्या सुमारास अक्षरश: या वणव्यात होरपळताना दिसतात. तर सततच्या लागत असलेल्या वणव्यांमुळे वनसंपदेची प्रचंड हानी होत असून, यामुळे पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांचा जीव तुटत आहे. तर हाकेच्या अंतरावर असलेल्या वनखात्याला मात्र याच काहीच वाटत नसल्याचे एकंदरीत परिस्थितीवरुन दिसून येत असल्याने वनखाते डोळेझाक करत असल्याचे सर्वत्र जात आहे.
मागील जानेवारी महिन्यांपासून हे वणवे लावण्याचे प्रमाण सुरू झाले आहे. वणवे लावल्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने व कायद्याचा धाक नसल्याने लाकडे चोरटे अथवा हातभट्टीदार यांचे अधिक फावत आहे. शिकार करणे, वृक्षतोड करणे, वनसंपदा मिळवणे तसेच सरपणासाठी लागणारा लाकूडफाटा यामुळे वणवे लावले जात असले तरी हे कायद्याच्या चौकटीत बसत वनखाते उदासीन दिसत आहे. हे असेच सुरु राहिले तर मानवी जीवनही धोक्यात येईल. यामुळे वनखात्यासह व संबंधितांनी याकडे लक्ष देऊन वणवे लावणार्यांवर कठोर कारवाही करावी, अशी मागणी उरण तालुक्यातील पर्यावरणप्रेमी तर काही डोंगर पायथ्याशी असलेल्या नागरिकांडून होत आहे.