। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्याच्या अनेक भागात कमी दाबाने वीज पुरवठा होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात माणगाव तर्फे आंबिवली, कुंभे आणि एकसल गावात कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. याबाबत महावितरण कंपनीकडे तक्रारी अर्जाचा ढीग साचला असून महावितरण कंपनीने तात्काळ या सर्व गावांचा वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत तालुक्यातील कुंभे, अंबिवली, एकसळ या गावातील वीज पुरवठा कमी दाबाने पुरवठा होत आहे. यातील तिन्ही गावे हि वेगवेगळ्या ग्रामपंचायत मधील आहेत. मात्र, हि तिन्ही गावे एकमेकांच्या जवळ आहेत. या सर्व तिन्ही गावांसाठी वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणकडून 220 केव्हीए क्षमतेचे वीज रोहित्र बसविले आहे. मात्र, वाढलेली लोकसंखय लक्षात घेऊन महावितरण कंपनीने तिन्ही गावांसाठी वेगवेगळे वीज रोहित्र बसविण्याची गरज आहे. माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत कडून आंबिवली गावासाठी तसेच आदिवासी वाडीसाठी मिळून नवीन स्वतंत्र वीज रोहित्र बसविण्याचा ठराव ग्रामपंचायतीकडून घेण्यात आला आहे. तर, चिंचवली ग्रामपंचायतमधील एकसल गावासाठी आणि कुंभे या जिते ग्रामपंचायत मधील गावासाठी देखील नवीन वीज रोहित्र बसविले तर कमी दाबाने होणार वीज पुरवठा हा विजेचा प्रश्न निकाली निघू शकतो.
आंबिवली गावातील विजेचा प्रश्न आम्ही अनेकवेळा तक्ररी करून देखील सुटत नाही. विद्युत कंपनी जातीने लक्ष देऊन इन्सुलटर नव्याने बसवावेत त्यामुळे कमी दाबाने विजेचा आणि वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार तात्काळ थांबवावेत. त्यात आमच्या गावासाठी स्वतंत्र वीज रोहित्र बसविण्याची कार्यवाही महावितरण करणार आहे कि नाही.
सदानंद अहिर.. जेष्ठ ग्रामस्थ