| पुणे | वृत्तसंस्था |
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच अनलॉक झालेले पाहायला मिळेल. याबाबतचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती कार्यक्रमात दिले. कोरोनाचे सावट असल्याने सगळ्या शिवप्रेमींना इथे येता आले नाही. परंतु, लवकरच हे सावट दूर होईल आणि सगळे इथे येऊ शकतील, असे अजित पवार म्हणाले.
कोरोना नियमांचे पालन करा. शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावर आपल्याला वाटचाल करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माला 400 वर्षे होत आली आहेत. तरीदेखील त्यांच्याबद्दलचा अभिमान, प्रेम, आदर प्रत्येक पिढीत वाढतच गेला आहे, असे यावेळी अजित पवार म्हणाले. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यात मार्चनंतरच शंभर टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे. तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतरही दररोज शेकडो रूग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे राज्याच्या टास्क फोर्सने सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मास्कमुक्तीचा निर्णयही मार्चनंतरच होणार आहे. ब्रिटनमध्ये डेल्टाक्रोनसारखा नवीन व्हेरियंट आढळला आहे. यामुळे अजून थोडावेळ अनलॉक करण्यासाठी घेतला जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
निर्बंधातून लवकरच सुटका
कोरोना निर्बंधात शिथिलता आणण्याच्या सूचना राज्यांना केंद्र सरकारने केल्या आहेत. त्यानुसार हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. दरम्यान, लवकरच कोरोनाच्या निर्बंधातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे.







