मालमत्ता कर वसुलीविरोधात उद्या मोर्चा
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक, अवास्तव व जनतेच्या दिशाभूल करणाऱ्या ‘मालमत्ता कर’ वसुलीविरोधात शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.), शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, सामाजिक संघटना व विविध फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पोलखोल धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा बुधवार, दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथून पनवेल महानगरपालिका कार्यालयापर्यंत निघणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे, मनसेचे योगेश चिले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगर प्रमुख अवचित राऊत, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, कॅप्टन कलावत, हेमराज म्हात्रे, मा. नगरसेविका शशिकला सिंग, नारायण घरत, राजेश केणी, ॲड. विजय गडगे, प्रकाश म्हात्रे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळाराम पाटील यांनी सांगितले की, सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षे कर न वाढवण्याचा दिलेला वायदा मोडून, अवास्तव करासह दंड/व्याज आकारणी केली जात आहे. शास्ती माफी म्हणजे फक्त व्याज/दंड माफी, मूळ मालमत्ता करात कोणतीही सूट नाही. पनवेल महानगरपालिका प्रत्यक्षात ड वर्गात असूनही, अ वर्गातील मुंबई-ठाण्यासारखा कर दर लावला जातो. मुंबई-ठाणे प्रमाणे सुविधा नसताना एवढा जादा कर आकारला जातो. 268 कोटींचा स्टील मार्केट कर माफ, पण सामान्य जनतेला फक्त व्याज/दंड माफी. नवी मुंबईत 20 वर्षांपासून ग्रामपंचायत दराने कर व 500 चौ. मी. संपूर्ण घरांना करमुक्ती, मात्र पनवेलमध्ये जास्तीचा कर आकारण्यात येत आहे. यासंदर्भात जनतेमध्ये संताप असून, त्याच्या निषेधार्थ हा पोलखोल मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की, पारदर्शक सर्वांना समजणारी करप्रणाली अंगीकारावी, केवळ ‘शास्ती माफी’ नव्हे तर, मालमत्ता करातही सवलत द्यावी, जनतेच्या खिशावर ताण टाकणारा अवास्तव कर त्वरित मागे घ्यावा, पनवेल महापालिकेचा कर दर, सुविधा व शहराच्या दर्जानुसार न्याय्य ठरावा, हा मोर्चा लोकांच्या हितासाठी असून, सर्व पनवेलकर नागरिकांनी यात सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.







