| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक, अवास्तव व जनतेच्या दिशाभूल करणाऱ्या मालमत्ता कर वसुलीविरोधात शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, सामाजिक संघटना व विविध फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पोलखोल धडक मोर्चा बुधवारी (दि.13) काढण्यात आला. या मोर्च्यामुळे प्रशासनाला चांगलाच घाम फुटला होता.
बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथून या मोर्च्याला सुरुवात करण्यात आली. या मोर्च्यामध्ये शेकापचे मा.आमदार बाळाराम पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील, मा.आ. बाळ माने, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, संजोग वाघेरे पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, मनसेचे योगेश चिले, शिवसेना उप जिल्हा प्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, महानगर प्रमुख अवचित राऊत, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, कॅप्टन कलावत, हेमराज म्हात्रे, मा.नगरसेविका शशिकला सिंग, नारायण घरत, राजेश केणी, ऍड. विजय गडगे, प्रकाश म्हात्रे, प्रदीप ठाकूर, महिला आघाडीच्या रेवती सपकाळ, अनिता डांगरकर, अर्चना कुळकर्णी, उज्ज्वला गावडे, श्रुती म्हात्रे, अश्विनी देसाई, महादेव वाघमारे, शहर प्रमुख यतीन देशमुख, सदानंद शिर्के, प्रकाश म्हसकर, गुरुनाथ पाटील, विश्वास पेटकर आदींसह हजारो त्रस्त नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी बाळाराम पाटील यांनी सांगितले की, सत्ताधाऱ्यांकडून पाच वर्षे कर न वाढवण्याचा दिलेला वायदा मोडून अवास्तव करासह दंड/व्याज आकारणी केली जात आहे. शास्ती माफी म्हणजे फक्त व्याज/दंड माफी, मूळ मालमत्ता करात कोणतीही सूट नाही. पनवेल महानगरपालिका प्रत्यक्षात ड वर्गात असूनही, अ वर्गातील मुंबई-ठाण्यासारखा कर दर लावला जातो. मुंबई-ठाण्याप्रमाणे सुविधा नसताना एवढा जादा कर आकारला जातो. 268 कोटींचा स्टील मार्केट कर माफ, पण सामान्य जनतेला फक्त व्याज/दंड माफी. नवी मुंबईत 20 वर्षांपासून ग्रामपंचायत दराने कर व 500 चौ.मी. संपूर्ण घरांना करमुक्ती, मात्र पनवेलमध्ये जास्तीचा कर आकारण्यात येत आहे. या संदर्भात जनतेमध्ये संताप असून त्याच्या निषेधार्थ हा पोलखोल मोर्चा काढण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनीसुद्धा आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका. महागरपालिका कार्यालयाची एकही काच जागेवर राहणार नाही, असा इशारा दिला. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की, पारदर्शक म्हणजेच सर्वांना समजणारी करप्रणाली अंगीकारावी, केवळ शास्ती माफी नव्हे तर मालमत्ता करातही सवलत द्यावी, जनतेच्या खिशावर ताण टाकणारा अवास्तव कर त्वरित मागे घ्यावा. पनवेल महापालिकेचा कर दर, सुविधा व शहराच्या दर्जानुसार न्याय्य ठरावा, हा मोर्चा लोकांच्या हितासाठी असून, सर्व पनवेलकर नागरिक यात सहभागी झाले आहेत. त्यानंतर शिष्टमंडळाने पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी भेट घेऊन त्यांच्यासमोर निवेदन सादर केले. तसेच पनवेलकरांच्या भावना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याची मागणी केली व येत्या गणेशोत्सवानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारासुद्धा बाळाराम पाटील यांनी दिला आहे. या निमित्ताने पनवेल शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरासंदर्भात पनवेल महापालिकेने लावलेल्या फलकावर नवी मुंबई विमानतळ लिहिले होते. त्याला आज काळे फासण्यात आले. तसेच केंद्राचा आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.







