विमान अपघाताला महिना उलटूनही एक रुपयाची मदत नाही
| उरण | प्रतिनिधी |
तालुक्यातील तरुणी मैथिली पाटील हिचा अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्या काळजाला चिरणाऱ्या घटनेला आज महिना उलटून गेला आहे. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी मोठ्या थाटात विविध मंत्र्यांकडून व प्रशासनाकडून भरघोस मदतीच्या घोषणा करण्यात आल्या. “ही आमची मुलगी आहे”, “सरकार कुटुंबाच्या पाठीशी आहे” असे भावनिक उद्गार व्यक्त होत, मदतीच्या घोषणा मोठ्या थाटात करण्यात आल्या. मात्र, त्या घटनेला आज एक महिना उलटूनही, मदतीचा एक रुपयाही तिच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचलेला नाही.
मैथिलीच्या कुटुंबात तिचे आईवडील, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. मैथिली ही सर्वात मोठी मुलगी होती. मैथिलीचे वडील पनवेलजवळील ओएनजीसीमध्ये कामगार आहेत. वृद्ध वडिलांना नाईलाजाने मजुरी करावी लागत आहे, तर आई व आजी यांचे डोळे सरकारकडे आशेने लागले आहेत. शासनाच्या निष्क्रियतेमुळे हे कुटुंब मदतीपासून वंचित आहे.
संवेदनशील हरपलेले नेते
प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सांत्वनाच्या भेटी, फोटोसेशन आणि टीव्हीवर प्रसिद्धीसाठी देण्यात आलेली आश्वासने यापलीकडे प्रत्यक्ष मदतीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. भावनिक आश्वासनांची उजळणी झाली, पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात मदतीच्या घोषणा म्हणजे एक ढोंगी स्वप्न ठरलं आहे, आणि लोकशाहीची संवेदनशीलता पुरती गढूळ झाली आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया समस्त उरणकरांमधून उमटू लागल्या आहेत.
वल्गना मोठ्या, कृती शून्य
या प्रकारामुळे लोकशाहीत नागरिकांच्या व्यथा ऐकल्या जातात, परंतु उपाययोजना वेळेवर होत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मैथिली पाटीलच्या कुटुंबाच्या दुःखावर केवळ कॅमेऱ्यात टिपलेली आसवे आणि बातम्यांतील वल्गना राहिल्या आहेत. कृती मात्र अद्यापही शून्य आहे.
भविष्याची चिंता
कुटुंबाचा आधार असणारी मुलगी आज आम्ही गमावली आहे. वडील ठेकेदाराकडे मजुरीचे काम करतात. ते कामावर नाही गेले, तर आमचा उदरनिर्वाह चालणार कसा, दोन मुलांच्या भविष्याचा विचार करुन आम्हाला मैथिली गेल्याच्या पंधरा दिवसांनंतर कामावर जाणे परिस्थितीने भाग पाडले आहे. परंतु, सरकारला, त्यांच्या अधिकाऱ्यांना कोणतेच सोयरसुतक नाही, अशी खंत मैथिलीची आई प्रमिला पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी लेकीच्या आठवणींनी त्यांना अश्रू अनावर झाले.






