| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
गुजरातमधील अहमदाबाद शहरात गुरुवारी (दि.12) दुपारी एक धक्कादायक विमान दुर्घटना घडली. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफ करताना एअर इंडियाचे प्रवासी विमान मेघानी नगर परिसरात कोसळले. या विमानात 242 प्रवासी आणि कर्मचारी होते.
प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटला आणि विमान खुल्या मैदानात कोसळले. या अपघातामुळे परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि काळ्या धुराचा लोट दिसून आला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. इमारती मोठ्या प्रमाणात कोसळल्या आहेत.
विमान कोसळल्यानंतर मेघानी नगर परिसरात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी आकाश व्यापले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातानंतर विमानाचे अवशेष आणि एक पंख तुटून पडलेला दिसला. स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रमाणात यश मिळाले आहे. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात विमानाच्या टेकऑफनंतर लगेच तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर येत आहे. वैमानिकाला विमान नियंत्रित करणे शक्य झाले नाही, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी विमानन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. या विमानात 133 प्रवासी होते, अशी माहिती आहे. परंतु. याला अधिकृत दुजोरा मिळणे बाकी आहे. तज्ज्ञांचे पथक लवकरच ब्लॅक बॉक्स तपासेल, ज्यामुळे अपघाताचे खरे कारण समोर येईल, अशी अपेक्षा आहे.
स्थानिकांमध्ये भीती आणि प्रशासनाच्या सूचना
या दुर्घटनेमुळे मेघानी नगर आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विमानतळ परिसरातही कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहण्याचे आवाहन केले आहे.







