हिवाळी अधिवेशनापुर्वी ममतादीदी दिल्लीत

पंतप्रधानांसह, अमित शहांच्या भेटी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, मात्र त्याआधी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत आहेत. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिवाळी अधिवेशनापूर्वी तीन दिवसांच्या दौर्‍यावर दिल्लीत आहेत. बॅनर्जी 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान दिल्लीत असतील. या दौर्‍यात ममता पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना भेटू शकतात. दिल्लीत ममता भाजप खासदार वरुण गांधी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे. या दौर्‍यात त्या काँग्रेस, सपा, बसपा या पक्षांच्या नेत्यांनाही भेटण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मे महिन्यात पश्‍चिम बंगालच्या विजयानंतर ममता जूनमध्ये दिल्लीत आल्या होत्या आणि त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, कमलनाथ आणि आनंद शर्मा यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. जूनच्या दौर्‍यावर त्या म्हणाले की, येत्या लोकसभेत भाजपपेक्षा विरोधक मजबूत असतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधक इतिहास रचतील, असा दावाही त्यांनी केला. यावेळी लोकसभा निवडणूक ही मोदी विरुद्ध देश अशी असेल,असेही त्यांनी सूचित केलेले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ममता बॅनर्जी त्यांच्या दिल्ली दौर्‍यात भाजप खासदार वरुण गांधी यांची भेट घेऊ शकतात. वरुण गांधी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार आहेत अशी चर्चा आहे. अलीकडेच वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढले गेले होते.
उत्तर प्रदेश, पंजाब, त्रिपुरा, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. बॅनर्जी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने विरोधकांना एकत्र करण्यात व्यस्त आहेत. यावेळी कृषीविषयक कायद्यांसह अनेक मुद्द्यांवर रणनीती आखण्याच्या उद्देशाने त्या दिल्लीच्या दौर्‍यावर जात असल्याचे मानले जात आहे.

काँग्रेसचा तृणमूल काँग्रेसवर हल्ला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी शनिवारी दावा केला की, तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान काँग्रेस शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी लढली, मात्र, तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर हा कायदा रद्द करण्याचे श्रेय घेतले. राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्ते देशभरात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत, पण त्याचवेळी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्ली दौर्‍यात आंदोलकांना भेटण्यासाठी जंतरमंतरवर गेल्या देखील नाहीत. आम्ही शेतकर्‍यांच्या हक्कासाठी 11 महिने लढलो, मग तृणमूल काँग्रेस कुठे होती? असा प्रश्‍न त्यांनी केला.

Exit mobile version