| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषेची सक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनाच्या मंचावरून केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजधानीत जेव्हा मराठी भाषेऐवजी हिंदी एकू येते, तेव्हा त्रास होतो. भाषेला आमचा विरोध नाही, मात्र हिंदीही आपली राष्ट्र भाषा नाही. मराठी, तामिळ भाषांप्रमाणे हिंदी उत्तम भाषा, पण ती आपली राष्ट्र भाषा नव्हे असे म्हणत पंतप्रधानांना जर आपल्या गुजरातविषयी प्रेम असेल, तर आपण मराठी लोक का मागे आहोत, हिंदी भाषेची कधीच राष्ट्रभाषा म्हणून निवड करण्यात आलेली नाही. फक्त केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये समन्वायाची ती भाषा आहे. आजपर्यंत कोणत्याच भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळालेला नाही. 20 वर्षांपूर्वी हाच मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्यावेळी अनेकांनी विरोध केला. आमच्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले, त्यामुळे त्या भाषेचा प्रभाव आमच्यावर झाला. पण मराठी लोक आपल्याच राज्यात हिंदी का बोलतात, असा सवाल राज ठाकरेंनी केला.